जळगाव ( वास्तव पोस्ट ) : डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त के.सी.ई. इंजिनीरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयांत वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. दरम्यान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय सुगंधी यांचे हस्ते डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला पूजन व पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय सुगंधी, अकॅडमिक डीन डॉ. प्रज्ञा विखार, पॉलिटेक्निकचे समन्व्यक डॉ.सी.एस. पाटील, ग्रंथालय प्रमुख प्रा.गणेश नेवे उपस्थित होते.
आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे की, डॉ.कलाम यांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू होते. जसे त्यांच्यामध्ये असणारी दुर्दम्य इच्छाशक्ती, आत्मविश्वास, कणखर मन आणि दिलदार स्वभाव. यामुळेच डॉ.कलाम यांनी देशाच्या युवा पिढीला आपल्या विचारांनी आणि कर्तृत्वाने भारावून टाकले होते. भारत नक्कीच महासत्ता बनेल असा विश्वास त्यांनी प्रत्येक भारतीयाच्या मनात निर्माण केला होता. त्यांनी लिहिलेल्या अनेक पुस्तकांमधून येणाऱ्या काळात भारत कसा महासत्ता म्हणून पुढे येणार आहे, भारताची खरी शक्ती ही युवाशक्ती कशी असणार आहे, हे त्यांनी सांगितले आहे. डॉ.कलाम यांचे लेखन स्फूर्तीदायी आहे. त्यामुळे शाळा-महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी डॉ.कलाम यांची पुस्तके वाचावीत, त्याचबरोबर इतर साहित्याचेही जास्तीत जास्त वाचन करावे आणि विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, या दृष्टीने वाचन प्रेरणा दिवसाचे आयोजन केले जात आहे.
या वाचन प्रेरणा दिनामध्ये शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाची आवड निर्माण करण्याचे उद्दिष्ट वाचन प्रेरणा दिनाचे आहे. आजच्या विद्यार्थ्यांचे अभ्यासाच्या व्यतिरिक्त अवांतर वाचन होणे आवश्यक आहे. वाचनामुळे होणारे फायदे, अवांतर वाचनामुळे विद्यार्थ्यांना अनेक संदर्भ मिळतात, त्यांची आकलन शक्ती वाढते तसेच इतरांवर आपल्या ज्ञानाचा प्रभाव टाकण्यासाठीही अवांतर वाचनाचा उपयोग होतो, विद्यार्थ्यांचा व्यक्तिगत विकास होतो हेच नेमके या उपक्रमातून साध्य करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. म्हणूनच शाळा महाविद्यालयापर्यंत हा उपक्रम सिमित न ठेवता आपण सर्वांनी वाचले पाहिजे, असे मला वाटते. ‘वाचाल तर वाचाल’ असे म्हटले जाते.
आजच्या २१ व्या शतकातही हे आपल्याला तंतोतंत पटणारे आहे. आजचा शाळेत जाणारा विद्यार्थी असो वा महाविद्यालयात शिकणारी विद्यार्थी, विद्यार्थीनी यांना टी.व्ही, स्मार्ट फोन, टॅबलेट, कॉम्प्युटर यापासून बाजूला करुन त्यांच्यामध्ये वाचनाची आवड निर्माण करणे या दिनाचा प्रमुख उद्देश आहे. हा दिवस त्या दिना पुरता मर्यादीत न राहता नेहमीच पुस्तक, मासिक, साहित्य यांचे वाचन व्हावे असे आव्हान डॉ संजय सुगंधी यांनी केले. प्रा विजय एन चौधरी, प्रा. रवींद्र स्वामी, ओम लीलाधर पाटील यांनी डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या कार्याला उजाळा दिला. या प्रसंगी उत्कृष्ट वाचक म्हणून प्रज्ञा चौधरी, अपर्णा खारे, ओम पाटील, करिष्मा तायडे यांना डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे पुस्तके भेट देण्यात आली.
कार्यक्रमाला दिनेश सावदेकर, धनराज पाटील, सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा.अश्विनी देवराळे यांनी केले
