मुंबई ( वास्तव पोस्ट ) : भारताच्या जेमिमा रॉड्रिग्ज हिच्या शानदार शतकी खेळीमुळे भारतीय महिला क्रिकेट संघाने गुरुवारी नवी मुंबईतील डीवाय पाटील स्पोर्ट्स अकादमीमध्ये ऑस्ट्रेलियाचा पाच विकेटने पराभव करत आयसीसी महिला विश्वचषक २०२५ च्या अंतिम फेरीमध्ये दिमाखदार प्रवेश केला.
ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना ४९.५ षटकांत सर्वबाद ३३८ धावा करत भारतासमोर विजयासाठी विश्वचषक बाद फेरीतील आतापर्यंतचे सर्वाधिक ३३९ धावांचे लक्ष्य ठेवले होते. ऑस्ट्रेलियाकडून फोबी लिचफिल्डने जबरदस्त शतक झळकावले, तर एलिस पेरी आणि ऍश गार्डनर यांनी अर्धशतके केली.
प्रत्यूत्तरात या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय महिला संघाने ऐतिहासिक कामगिरी केली. जेमिमा रॉड्रिग्जने १३४ चेंडूत नाबाद १२७ धावांची उत्कृष्ट खेळी साकारली. तिला कर्णधार हरमनप्रीत कौरने (८८ चेंडूत ८९ धावा) मोलाची साथ दिली. दीप्ती शर्मा (२४) आणि रिचा घोष (२६) यांच्या महत्त्वपूर्ण योगदानामुळे भारताने नऊ चेंडू शिल्लक असतानाच लक्ष्य गाठले आणि महिला एकदिवसीय सामन्यातील सर्वाधिक धावांचा यशस्वी पाठलाग करण्याचा विक्रमदेखील केला.
या उपांत्य फेरीच्या विजयामुळे रविवारी होणाऱ्या आयसीसी महिला विश्वचषक २०२५ च्या अंतिम सामन्यात भारताने आपले स्थान निश्चित केले आहे. अंतिम सामन्यात भारताचा सामना आता दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. , दक्षिण आफ्रिकेने बुधवारी पहिल्या उपांत्य सामन्यात इंग्लंडला हरवून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
या सामन्याआधी, ऑस्ट्रेलियाने स्पर्धेत केवळ श्रीलंकेविरुद्धचा पावसामुळे अनिर्णीत राहिलेला सामना वगळता आपले सर्व सामने जिंकले होते. याउलट, भारताने गट टप्प्यात दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडकडून पराभव पत्करल्यानंतर चौथ्या स्थानावर समाधान मानले होते, परंतु महिला संघाने महत्त्वाच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात चमकदार कामगिरी केली.
