नवी दिल्ली | दि.१८ ( वास्तव पोस्ट न्यूज ) -भारतीय निवडणूक आयोगाने आज गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या सहा राज्यांच्या गृहसचिवांची बदली केली. निवडणूक नियामक मंडळाने पश्चिम बंगालचे महासंचालक राजीव कुमार यांनाही हटवले आहे. लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केल्यानंतर काही तासात सीईसी राजीव कुमार यांच्या नेतृत्वाखालील मतदान समितीने मिझोराम आणि हिमाचल प्रदेशच्या सामान्य प्रशासकीय विभागांच्या सचिवांनाही हटवले आणि बृहन्मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंग चहल, अतिरिक्त आयुक्त आणि उपायुक्तांना हटवण्याचे आदेश दिले.
निवडणूक आयोगाने सर्व राज्य सरकारांना निवडणूक कामाशी संबंधित ज्या अधिकाऱ्यांनी तीन वर्षे पूर्ण केली आहेत किंवा ज्यांची गृहजिल्ह्यात नियुक्ती आहे, त्यांच्या बदल्या करण्याचे निर्देश दिले होते. परंतु, महाराष्ट्राने काही महापालिका आयुक्त आणि काही अतिरिक्त आणि उपमहापालिका आयुक्तांच्या संदर्भात निर्देशांचे पालन केलेले नाही. राज्याच्या मुख्य सचिवांकडे नाराजी व्यक्त करत निवडणूक मंडळाने सोमवारी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत बीएमसी आणि अतिरिक्त आणि उपायुक्तांच्या बदल्या करण्याचे निर्देश दिले.
चहल हे १९९८ च्या बॅचचे महाराष्ट्र केडरचे आयएस अधिकारी आहेत. चहल यांनी २०२० मध्ये कोविड काळात मुंबईच्या आयुक्त पदाचा पदभार स्वीकाराला होता. यानंतर चहल यांचा कार्यकाळ संपल्यानंतर तो वाढवण्यात आला होता. परंतु, आता आयोगाच्या आदेशानंतर चहल यांची बदली करण्यात आली आहे. चहल यांची कोणत्या विभागात बदली करण्यात आली हे अद्यापही कळाले नाही.
