मुंबई ( वास्तव पोस्ट न्यूज ) : राज्यभरात करण्यात आलेला मान्सूनपूर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी राज्य आपत्ती निवारण विभागाची आढावा बैठक आज मुंबई येथे पार पडली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील उपस्थित होते.
यावेळी प्रामुख्याने राज्यातील एसडीआरएफच्या टीमची संख्या वाढवावी, ठाणे महानगरपालिकेच्या टीडीआरएफप्रमाणे प्रत्येक मनपाने स्वतःची आपत्कालीन पथक तयार करावे. स्थानिक तरुणांना प्रशिक्षण देऊन बचवकार्यात त्यांची मदत घ्यावी असे निर्देश मुख्यमंत्री यांचेकडून देण्यात आले.

आजच्या या बैठकीला मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, जलसंधारण मंत्री संजय राठोड, मुख्य सचिव डॉ.नितीन करीर, मदत आणि पुनर्वसन सचिव सोनिया सेठी, मुंबई पालिका आयुक्त भूषण गगराणी, मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर तसेच राज्य प्रशासनातील सर्व विभागांचे प्रधान सचिव आणि नौदल, पायदळ आणि हवाई दलाचे मुंबई विभागीय अधिकारी, मध्य आणि पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक, मुंबई मेट्रो, म्हाडा, एनडीआरएफ, एसडीआरएफचे अधिकारी सर्व विभागाचे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी तसेच संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
