छत्रपती संभाजीनगर | दि.३१ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – लोकसभा तिकीट वाटपामुळे गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटात दानवे आणि खैरे यांच्यात सुरू असलेली धुसफूस संपली आहे. चंद्रकांत खैरे यांचा प्रचार करणार नाही अशी भूमिका घेणारे आणि भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा सुरू असलेले अंबादास दानवे यांनी आज चंद्रकांत खैरे यांची भेट घेत त्यांना पेढा भरवून दोघांच्या वादाला पूर्ण विराम दिला आहे. खैरे यांना दानवे यांनी निवडणुकीच्या शुभेच्छा देखील दिल्या आहेत.
दरम्यान छत्रपती संभाजी नगरमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या दानवे विरुद्ध खैरे वादामुळे उद्धव ठाकरे यांची तसेच मविआची डोकेदुखी वाढली होती. मतदारसंघातुन दोघेही लोकसभा निवडणुक लढण्यासाठी इच्छुक होते. दरम्यान, पक्षाने चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी दिल्याने दानवे हे नाराज झाले होते. त्यांनी खैरे यांचा प्रचार न करता केवळ पक्षाचे काम करू अशी वल्गना केली होती. त्यामुळे दोघांचा वाद हा समोर आला होता. मात्र, अंबादास दानवे यांनी या प्रकरणात माघार घेत आज खैरेंची यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्यांना लोकसभा निवडणुकीसाठी शुभेच्छा देत पेढा भरवून दोघांमधील वाद मिटवला.
चंद्रकांत खैरे यांनी प्रचार कार्यालयाचे उद्घाटन गेल्या आठवड्यात केले, मात्र यावेळी दानवे यांना बोलावले नसल्याने हा वाद वाढला होता. यामुळे थेट उद्धव ठाकरें यांना मध्यस्थी करावी लागली होती. मागील लोकसभा निवडणुकीत अंबादास दानवे यांच्यामुळे आपला पराभव झाला असे चंद्रकांत खैरे जाहीर बोलले होते. चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी जाहीर झाल्यावर अंबादास दानवेंनी व्हाट्सअप स्टेटस ठेवत पुन्हा नाराजी व्यक्त केली होती. मात्र, हा वाद त्यांनी आता संपवला आहे.
या भेटीनंतर अंबादास दानवे म्हणाले, आमच्यात वैचारिक वाद होते. मात्र आता हे वाद दूर झाले असून आम्ही एकत्र काम करू आणि जिंकूही. आम्ही दोघेही मित्रच आहोत. मात्र, आमच्या अपेक्षा होत्या, असे देखील ते म्हणाले.
