पुणे ( वास्तव पोस्ट ) : ‘सध्या समाजासमाजात भेदाभेद, जातिभेद या विषमतेने पुन्हा डोके वर काढले आहे. पूर्वीची परिस्थितीशी तुलना करता केवळ शारीरिक संघर्ष संपला आहे. मात्र, मानसिक पातळीवर अद्याप संघर्ष सुरू असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी भीमा कोरेगाव येथे शौर्य दिनाच्या निमित्ताने अभिवादन करण्यासाठी आले असताना म्हटले आहे.
यावेळी ॲड.आंबेडकर म्हणाले की, ‘समाजातील विषमता आणि अमानुष वागणूक यांमधील शारीरिक लढा संपला आहे. मात्र, मानसिकरीत्या हा लढा अद्यापही सुरूच आहे. काही लोकांची मानसिकता अद्याप तशीच आहे. त्यामुळे परभणी आणि बीडसारख्या अमानुष घटना घडत आहेत. अशीच अवस्था राहिली, तर भीम समुदाय मोठ्या संख्येने अभिवादन सोहळ्यात सहभागी होण्याची चळवळ सुरू ठेवतील. त्यामुळे मानवतावादी लढा ज्यांनी सुरू केला त्यांनी पुढे यावे, तरच परस्पर समाजातील विषमतेचा लढा संपुष्टात येईल.’
ॲड. आंबेडकरांची भीमा कोरेगाव येथील सुविधांबाबत नाराजी :
विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यातील सुविधांबाबत ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, ‘या सोहळ्यासाठी सरकार सुविधा पुरवते. मात्र, त्या सुविधा अपुऱ्या आहेत. पुढील वर्षी या सुविधा आणखी चांगल्या पुरविण्याची अपेक्षा आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेकडून (बार्टी) पुढाकार घेणे महत्त्वाचे आहे,’ असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.
