भुसावळ ( वास्तव पोस्ट ) प्रतिनिधी भुसावळ : जगामध्ये वाढत्या लोकसंख्येसोबतच वाहनांची संख्या वाढली आहे, यामुळे खनिज तेलाचा उपसा मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. खनिज तेलाचे साठे हे मर्यादित असून भविष्यात संपण्याची भीती निर्माण झाली आहे. यासाठी प्रत्येकाने आपले कर्तव्य म्हणून इंधन बचत करा, अन्यथा संकटाला सामोरे जा असे प्रतिपादन सुनील वानखेडे यांनी केले. दि१६ जानेवारी ते दि.१५ फेब्रुवारी इंधन बचत मासिक कार्यक्रम-२०२५ चे उद्घाटन भुसावळ आगारात करण्यात आले, यावेळी ते बोलत होते.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळ जळगाव विभागाच्या वतीने आयोजित इंधन बचत कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आगार प्रमुख राकेश शिवदे होते. यावेळी सहाय्यक वाहतूक निरीक्षक एस.ए. पवार, एस.बी. चौधरी सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक, सागर देवकर आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना वानखेडे म्हणाले की विश्वात भविष्यात ऊर्जा व इंधनाचे संकट निर्माण होणार आहे. त्यासाठी आतापासूनच इंधन बचत करण्याची प्रत्येकाने तयारी केली पाहिजे, अन्यथा पुन्हा आपल्याला आदिमानवाच्या काळाकडे वळावे लागेल. गरज असेल तरच वैयक्तिक वाहनाचा वापर करा, पायी अथवा सायकलीचा वापर जास्तीत जास्त करा. ऊर्जेचा सुयोग्य वापर करा, इंधनाची बचत होऊन पर्यावरणाचा बिघडणारा समतोल थांबवणे देखील गरजेचे आहे हे एकट्याचे काम नसून एकत्रित सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे असेही ते म्हणाले.
अध्यक्षीय भाषणात राकेश शिवदे म्हणाले की दररोजचे काम करत असतांना वाहनातील डिझेल मेकॅनिक तर वाहन चालवत असताना ड्रायव्हर यांनी बचत केली पाहिजे. यामुळे आपण इंधनासाठी करावा लागणारा खर्च कमी करून हा पैसा सर्वसामान्यांच्या विकासासाठी वापरता येऊ शकतो यासाठी इच्छाशक्तीची गरज आहे.

■ इंधन बचत मासाचे स्टिकर लावले :
१६ जानेवारी हा इंधन बचत महिन्याचा पहिला दिवस असल्याने आगार प्रमुख राकेश शिवदे यांनी वाहक चालक तसेच प्रवाशांना जनजागृती करण्यासाठी इंधन बचत मासिक बॅच खिशाला लावून जनजागृती केली. तसेच इतरांना देखील बचत करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धर्मराज देवकर यांनी तर आभार सागर देवकर यांनी मांनले यावेळी आगारातील कर्मचारी वाहक चालक उपस्थित होते.
