मुंबई ( वास्तव पोस्ट ) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेत आणि केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्रातील विमानतळांसंदर्भात आढावा बैठक झाली. बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातल्या विमानतळांच्या कामांना गती देण्याचे निर्देश दिले.
केंद्र सरकार आणि राज्य सरकारने विमानतळांसाठी आवश्यक त्या पायाभूत सुविधा निर्माण करणे अतिशय गरजेचे आहे. देश ५ ट्रिलियन डॉलर्स इकॉनॉमीकडे वाटचाल करत असताना, सर्वात वेगाने वाढणारे विमान वाहतूक क्षेत्र फार महत्त्वाचे आहे. महाराष्ट्र देशाचे ग्रोथ इंजिन म्हणून काम करत आहे. त्यामुळे नागरी विमान क्षेत्राचा वाढता विस्तार विचारात घेऊन पायाभूत सुविधांचा विस्तार करावा लागणार आहे, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

बैठकीदरम्यान संबंधित विमानतळांसंबंधी मुख्यमंत्री फडणवीस यांनी खालील निर्देश दिले.
◆ सोलापूर आणि कोल्हापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगची व्यवस्था करणे.
◆ शिर्डी विमानतळावर नाईट लँडिंग व्यवस्था तातडीने सुरु करणे.
◆ नागपूर आणि शिर्डी विमानतळाचे प्रलंबित प्रश्न ३१ मार्चपर्यंत सोडवण्याचे निर्देश.
◆ जळगाव विमानतळ येथे नवीन टर्मिनल इमारत तयार करा.
◆ पुरंदर विमानतळासाठी जमीन अधिग्रहण प्रक्रिया लवकर सुरू करण्याचे आदेश.
◆ पालघर विमानतळ उभारणीसाठी प्रक्रिया सुरू करा.
◆ वाढवण येथील प्रस्तावित नवीन विमानतळाबाबत तात्काळ निर्णय घ्या.
◆ नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम अधिक गतीने काम सुरू करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे.
◆ नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम गुणवत्तापूर्ण पण कालमर्यादेत करण्यासाठीचे निर्देश.
◆ आशियातील सर्वात मोठी फ्लाईंग अकॅडमी एअर इंडिया अमरावतीत सुरु करण्यासंबंधी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर सादरीकरण.

यावेळी नागरी विमान वाहतूक मंत्रालय, भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे कार्यकारी अधिकारी, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचे कार्यकारी अधिकारी उपस्थित होते. तसेच मुख्यमंत्री सचिवालय तसेच विविध विभागांचे अतिरिक्त मुख्य सचिव उपस्थित होते.
