Headlines
Home » महाराष्ट्र » मोठ्या आकाला वाचवण्यासाठी लहान आकाचा एन्काऊंटरही ! वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा

मोठ्या आकाला वाचवण्यासाठी लहान आकाचा एन्काऊंटरही ! वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दररोज काहीतरी नवीन बातम्या या प्रकरणात समोर येत आहेत. वाल्मिक कराड यांना खंडणीच्या आरोपामध्ये व हत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी म्हणून अटक करण्यात आली आहे. वाल्मिक कराड पुण्यात सीआयडीला शरण आल्यानंतर त्याला केज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १५ दिवसांची सीआयडीची कोठडी सुनावली आहे.

या प्रकरणावरून विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलतांना खळबळजनक दावा केला आहे. वडेट्टीवार म्हणाले की, “पोलीस ठाण्यात वाल्मिक कराड याचे लाड पुरवले जात आहे. त्याच्यासाठी पोलीस ठाण्यात बेड आणले आहेत. त्यावर पोलिसांसाठी बेड आणल्याचा खुलासा केला. पण यापूर्वी कधी पोलीस ठाण्यात बेड आणले गेले नाही. पोलीस आतापर्यंत कधी कॉटवर झोपले नाही. मग हे कोणाचे लाड करत आहे. पोलीस कोठडीत वाल्मिक कराड याला झोपवण्यासाठी ते कॉट आणले गेले काय, याची चौकशी झाली पाहिजे”, असे त्यांनी म्हटले.

वडेट्टीवार पुढे म्हणाले की, “या गुन्ह्यातील सुत्रधारांना वाचवण्यासाठी आरोपीचे एन्काऊंटर केले जाऊ शकते. मोठ्या आकाला वाचवण्यासाठी या लहान आकाचा एन्काऊंटरही होऊ शकतो. म्हणून पोलिसांना विनंती आहे की, मोठ्या आकांना वाचवण्यासाठी याचा एन्काऊंटर करू नका. हा बिचारा म्हणणार नाही, पण त्या मोठ्या आकापर्यंत जाण्यासाठी जर याचा वापर होणार असेल तर तो पुरावा नष्ट होण्याची शक्यता आहे. मला काल विश्वसनीय माहिती, जवळच्या एका उच्चपदस्थ अधिकार्‍याने दिली. यावरून काहीही होऊ शकते, अशी शक्यता या प्रकरणामध्ये आहे”, असा खळबळजनक दावा विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

तसेच विजय वडेट्टीवार यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत महायुती सरकारवर आरोप केले आहेत. ते म्हणाले की, “महायुती सरकारच्या लाडके आरोपी योजनेत वाल्मिक कराड येत असल्याने बीड पोलीस स्थानकात नवीन पाच पलंग आले का? वाल्मिक कराड पोलीस कोठडीमध्ये असताना पाच पलांगांची आवश्यकता भासावी, इतके योगायोग चित्रपटात ही नसतात. आरोपीचे लाड पुरवण्याची ही सुरुवात आहे, हळूहळू टिव्ही, एसी, पंचतारांकित हॉटेल मधील जेवण सगळच मिळेल!

वाल्मिक कराडवर या सरकारला निष्पक्ष कारवाई करायची आहे का? करायची असेल तर बीड जिल्ह्याच्या बाहेर चौकशी आणि तपास केला पाहिजे. ज्याने पोलिसांना आतापर्यंत आपल्या धाकात ठेवले ते त्याची चौकशी करणार की सेवा? सरकारने कराडवर कारवाई करण्याचे नाटक एकतर बंद करावे आणि कारवाई करायची असेल तर ती गांभीर्यपूर्वक करावी. कराडवर अजून ही संतोष देशमुख हत्या असो की मकोका अंतर्गत गुन्हा ही दाखल झालेले नाही, त्यामुळे या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे!”, असे वडेट्टीवार यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!