मुंबई ( वास्तव पोस्ट ) : मुंबईतील प्रसिद्ध गेटवे ऑफ इंडियाजवळ प्रवाशांनी भरलेली बोट समुद्रात उलटल्याची घटना घडली. या दुर्घटनेत आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, १०१ जणांची सुखरुप सुटका करण्यात आली आहे, अशी माहिती एएनआय वृत्त संस्थेने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हवाल्याने दिली आहे. या दुर्घटनेतील अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियावरून एलिफंटा बेटाकडे जाणारी बोट आज दुपारी चार वाजेच्या सुमाारास अचानक समुद्रात बुडू लागली. यानंतर स्थानिक मासेमारी नौकांच्या मदतीने नौदल, जेएनपीटी, तटरक्षक दल आणि यलोगेट पोलिस स्टेशन ३ यांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेऊन मदत आणि बचावकार्याला सुरूवात केली. अधिकारी या घटनेचा तपास करत आहेत. नीलकमल असे या बोटीचे नाव आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. नौदलाची स्पीड बोट प्रवासी बोटीला धडकल्याने हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. सध्या घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे.
एलिफंटाला जाणाऱ्या फेरीबोटीच्या दुर्घटनेची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री शिंदे यांनी रायगड जिल्हाधिकारी किसन जावळे, मुंबई शहर जिल्हाधिकारी संजय यादव यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून बचावकार्याची माहिती घेतली. त्याचबरोबर पोलिस उपआयुक्त (बंदरे) सुधाकर पाठारे यांच्याशीही दूरध्वनीवरून संवाद साधत माहिती घेतली.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मुंबईजवळ बुचर बेटावर दुपारी ३ वाजून ५५ मिनिटांनी नीलकमल नावाची बोट नौदलाच्या बोटीला धडकून उलटली. आतापर्यंत १०१ जणांना वाचवण्यात यश आले आहे. मात्र, संध्याकाळी ७.३० वाजेपर्यंत १३ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये १० नागरिक आणि तीन नौदलाचे जवान होते. गंभीर जखमी झालेल्या दोघांवर नेव्ही डॉकयार्ड रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भारतीय नौदल, तटरक्षक दल आणि पोलिसांनी बचावकार्यासाठी ११ क्राफ्ट आणि चार हेलिकॉप्टरतैनात केले आहेत. मात्र, ही कारवाई अजूनही सुरू असून आहे. उद्या सकाळपर्यंत बेपत्ता व्यक्तींबाबत अधिक माहिती उपलब्ध होईल. मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पाच लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे. या घटनेचा पोलीस आणि भारतीय नौदल संयुक्तपणे तपास करणार आहेत.
