नागपूर ( प्रतिनिधी ) दि .२७, मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांच्या १३ मागण्यांपैकी मराठा आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घेण्याच्या मागणीवर सरसकट गुन्हे मागे घेतले जाणार नाही . असे राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दि.२७ रोजी माध्यमांशी बोलताना सांगितले . फडणवीस यांनी सांगितले की, आंदोलनाचे गुन्हे मागे घेतले जाणार आहेत. मात्र घरे जाळणे, थेट हल्ला करणे, एसटी जाळपोळ करणे हे गुन्हे न्यायालयाच्या आदेशाशिवाय मागे घेता येणार नाहीत.
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले की, मराठा आरक्षणावर सरकारने सकारात्मकता दाखवली आहे. मी मनोज जरांगे यांचे अभिनंदन करतो. मात्र, या प्रश्नावर कायदेशीर मार्ग काढावा लागेल, हे आम्ही आधीपासून म्हणत आहोत. नोंदी असलेल्या रक्ताच्या नात्यातील लोकांना प्रमाणपत्र कसे देता येईल, हा मार्ग स्वीकारला आहे. त्यामुळे मराठा समाजाचा प्रश्न सुटेल. दुसरीकडे हा निर्णय घेत असताना आम्ही ओबीसींवर अन्याय होऊ दिलेला नाही. राज्यातील सर्व समाजाला न्याय देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले. तसेच छगन भुजबळ यांना मी सांगू इच्छितो की, कायदेशीर अडचण होती ती दूर करून कार्यपद्धती सोपी केली आहे. ओबीसींवर अन्याय होणार नाही. भुजबळ यांचेही लवकरात लवकर समाधान होईल.
