नवी दिल्ली | दि.१९ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूक २०२४ च्या तारखांची घोषणा केल्यापासून राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. निवडणूक प्रचाराच्या रणनितीसोबतच आपला अजेंडा ठरवण्यात राजकीय पक्ष व्यस्त झाले आहेत. आपल्या जाहीरनाम्यातून जास्तीत जास्त जनेतला आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
काँग्रेस याबाबत सक्रीय झाली असून आज दिल्लीत काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक पार पडली. यामध्ये पक्षाच्या जाहीरनाम्यावर चर्चा झाली. मिळालेल्या माहितीनुसार काँग्रेस यावेळी सच्चर समितीचा अहवाल तसेच जुनी पेन्शन योजना लागू करण्याचे आश्वासन जाहीरनाम्यात देऊ शकते. तसेच यामध्ये लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये पक्षाचा जाहीरनामा काय असणार, यावर चर्चा झाली.
बैठकीनंतर लोकसभेसाठी पक्षाचा अजेंडा काय असेल याची माहिती देण्यात आली. काँग्रेस जनतेला ५ न्याय आणि २५ गॅरेंटी देणार आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी म्हटले की, काँग्रेसच्या वर्किंग समितीच्या (सीडब्ल्यूसी) बैठकीत जाहीरमान्यावर विचार-विनिमय करण्यात आला. भारत जोडो न्याय यात्रेचे पाच पांच स्तंभ – शेतकरी न्याय, युवक न्याय, महिला न्याय, कामगार न्याय आणि हिसेदारी न्यायमध्ये प्रत्येकी ५ गॅरंटी देण्यात आल्या.
