Home » जळगाव » भाग्यापेक्षा पुरूषार्थ महत्त्वाचा : परमपूज्य सुमितमुनी

भाग्यापेक्षा पुरूषार्थ महत्त्वाचा : परमपूज्य सुमितमुनी

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : मनुष्याकडे अनंत शक्ती आहेत, त्या मोक्षप्राप्तीसाठी महत्त्वपूर्ण आहेत. चार अंगाने विचार केल्यास ईश्वरतत्त्व प्राप्त होते. मनुष्यतत्व, ऐकणे, श्रद्धा, संयम-पराक्रम-पुरूषार्थ यांच्या चांगल्या आचरणामुळे मनुष्याला मोक्ष प्राप्त होऊ शकतो. आध्यात्मिक, व्यावहारिक, भौतिक क्षेत्र असो किंवा कुठलेही क्षेत्र असो विना पुरूषार्थ कोणीही यशस्वी होऊ शकत नाही. ‘स्थिर भाग’ आणि ‘अस्थिर भाग’ हे दोन भाग यशस्वी होण्यासाठी आवश्यक असतात. स्थिर भाग म्हणजे भाग्य, प्रारब्ध होय, आणि अस्थिर भाग म्हणजे पुरूषार्थ, पराक्रम होय.

भाग्यावर विश्वास ठेवणारे, आपल्या भाग्यात असेल तर मिळेल अशी भावना ठेवतात आणि तसे आचरणही करतात. मात्र एखादे ध्येय घेऊन उद्यमशीलता जपून पुरूषार्थ करुन कार्यसिद्धीस करणारे खऱ्या अर्थाने मनुष्य होतात, ते साहसी असतात. भाग्याचा निर्माते आपण स्वत: आहे असे मानतात. भाग्याने काही मिळाले असले तरी ते टिकविणे त्यात भर टाकणे हे पुरूषार्थी मनुष्याचे लक्षण होय. धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे पुरूषार्थाचे चार प्रकार असून सत्व पुरूषार्थाकडे वळले पाहिजे. यातूनच ‘जैन’ पासून ‘जीन’ होण्याच्या प्रवास साध्य होईल, असे प्रेरणादायी विचार आज धर्मसभेत शासनदीपक प.पु. सुमितमुनिजी यांनी श्रावक-श्राविकांसमोर मांडले.

बारा तप आहे. त्यात स्वाध्याय सर्वश्रेष्ठ तप आहे. आत्मजागृतीचा उपाय म्हणजे स्वाध्याय. मोबाईल, टिव्ही पाहण्यासह, पार्टी व अन्य कामांसाठी मनुष्याजवळ वेळ आहे, मात्र आत्मोन्नतीसाठी वेळ नाही. आत्माला महात्मा आणि महात्माला परमात्मा ‘स्वाध्याय’ करतो. मात्र मनुष्याला धनआत्मा व्हायचेय. अजूनही स्वाध्यायचे महत्त्व मनुष्याला समजलेले नाहीये. मनुष्यासाठी ते प्रोटिन प्रमाणे कार्य करते. जो मनुष्य धर्म करत नाही तो पशूसमान आहे. मनुष्य जन्माला आलो तरी अजूनही आपण मनुष्य झालो नाही. दान, शील, तप, निरग्रंथ श्रेष्ठ असून तपस्यांमध्ये ‘स्वाध्याय’ श्रेष्ठ मानले जाते. मेंदुत धर्माचा विचार आणि हृदयात धर्मप्रेम असेल तर सर्वकाही शक्य आहे, असे विचार आरंभी परमपूज्य प.पु.भुतीप्रज्ञमुनी यांनी मांडले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!