मुंबई | दि.२६ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – राज्यात लोकसभा निवडणूक २०२४ निमित्ताने पुन्हा एकदा २०१९ सारखी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. या आघाडीचं नेतृत्त्व वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्याकडे असेल. त्या दिशेने मोठ्या हालचाली देखील सुरू झाल्या आहेत. लोकसभा २०१९ च्या निवडणुकीत अनेक मतदारसंघांमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी लाखांवर मतं घेतली होती, त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादीला त्याचा फटका बसला. तर फायदा मात्र भाजप-शिवसेना युतीला झाला होता.
दरम्यान महाविकास आघाडीने वंचितला बहुजन आघाडीला ४ जागांचा पदिलेला प्रस्ताव वंचितला मान्य नाही. तुमच्या ४ जागा तुमच्याकडेच ठेवा, असं प्रकाश आंबेडकरांनी पत्रकार परिषदेत म्हटलं होतं. महाविकास आघाडीनं काही सकारात्मक पावलं न उचलल्यास आपण भूमिका जाहीर करू, २६ मार्चपर्यंत आम्ही प्रतीक्षा करणार असा अल्टिमेटम आंबेडकरांनी दिला होता. त्यामुळे आज आंबेडकर काय भूमिका जाहीर करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी, प्रकाश शेंडगे यांचा ओबीसी बहुजन पक्ष, डावे पक्ष लोकसभा निवडणुकीसाठी एकत्र येऊन तिसरी आघाडी तयार करू शकतात. प्रकाश आंबेडकर यांच्याकडे या आघाडीचं नेतृत्त्व दिलं जाऊ शकतं. तिसरी आघाडी प्रत्यक्षात आल्यास वंचित बहुजन आघाडी २९ जागांवर निवडणूक लढवू शकते. प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आरक्षणावरुन घेतलेली भूमिका, त्यांनी घेतलेली मनोज जरांगे पाटील यांची भेट पाहता जरांगेंना मानणारा एक मोठा वर्ग या आघाडीला साथ देऊ शकतो.
अचानक वेगाने घडलेल्या ह्या घडामोडीने उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यासोबतच भाजप आणि इतर पक्ष तसेच राजकीय विश्लेषकांची चांगलीच तारंबळ उडाली. जर ही तिसरी आघाडी उदयास आली तर सत्तेचा सारीपाट पूर्णपणे बदलनार आहे. आणि म्हणूनच की काय आजचा दिलेला अल्टीमेट संपण्याच्या आधीच नाना पटोले म्हणाले की प्रकाश आंबेडकर यांनी घाई गडबडीत कोणताही निर्णय घेऊ नये. तर बाळासाहेब थोरात यांनी, या ऐतिहासिक निवडणुकीत वंचितच आघाडी ही महाविकास आघाडीसोबत असणे गरजेचे आहे असे विधान केले.
महविकास आघाडीची काल जागावाटपाबद्दल दोन तास चर्चा झाली. मातोश्रीवर झालेल्या या बैठकीत वंचितबद्दलही चर्चा झाल्याचं कळतं. पण जर वंचित महविकास आघाडीत आहे तर त्यांना जागावाटप चर्चेत सामील का केले जातं नाही ? हे मात्र अद्यापही न उलगडलेले कोड़े आहे. उदयास येणाऱ्या तिसऱ्या आघाडीच्या भीतीने म्हणा किंवा इतर काही कारणाने, मविआकडून वंचितला आता नवीन प्रस्ताव दिला आहे. यावेळी वंचित आघडीला २/४ नव्हे तर चक्क ५ जागा देऊ केल्या आहेत. हा शेवटचा प्रस्ताव असेल असेही नमुद करण्यात आले आहे. आता ह्या प्रस्तावावर वंचित आघाडीकडून काय निर्णय घेतला जातो याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे. या संदर्भात प्रकाश आंबेडकर उद्या पत्रकार परिषद घेऊन निर्णय जाहिर करणार असुन, त्यानंतर ठाकरे गटाकडून त्यांची यादी घोषित केली जाण्याची शक्यता आहे.
