मुंबई ( वास्तव पोस्ट न्यूज ) : आज सकाळपासून मुंबई आणि उपनगरात पावसाचा जोर असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबईतील सायन-माटुंगा, चुनाभट्टी, कुर्ला येथे पाणी साचल्याने लोकल सेवेवर त्याचा परिणाम झाला आहे. बदलापूरात उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडली असुन बदलापूरात NDRF चे पथक दाखल झाले आहे.
मुंबई आणि उपनगरात बऱ्याच ठिकाणी काल रात्री पासुनच पुन्हा जोरदार पाऊस सुरु झाला आहे. रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आल्याने ठाणे जिल्ह्यातील सर्व शाळा आणि कार्यालयांना सुटी देण्यात आली आहे. ठाणे जिल्ह्यात देखील सकाळपासून जबरदस्त पाऊस कोसळत आहे. उल्हासनदीने साडे सतरा मीटर ही पुर रेषा ओलांडल्याने बदलापूरात एनडीआरएफची ३५ जणांची टीम रवाना झाली आहे.
उल्हासनगरातील पेट्रोल पंप देखील पाण्याखाली गेला आहे. कल्याण अशोक नगर परिसर जलमय झाला आहे. वालधुनी नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या या अशोक नगरामधील अनेक घरे पाण्याखाली गेली आहेत. घरामध्ये राहणारे रहिवासी घरे सोडून आपल्या नातेवाईकांकडे गेली आहेत.
