जळगाव ( वास्तव पोस्ट ) : भाजपच्या खासदार स्मिता उदय वाघ यांना संसदरत्न पुरस्कार २०२५ साठी गौरविण्यात आल्याबद्दल जळगाव जिल्ह्यातील सर्व मंत्री, आमदार आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.
देशभरातील १७ खासदारांमध्ये निवड झालेल्या खासदार वाघ या ‘समग्र कामगिरी’साठी हा पुरस्कार मिळवणाऱ्या देशातील पहिल्या महिला खासदार ठरल्या आहेत. त्यांच्या या यशामुळे जिल्ह्यात सर्वत्र आनंद आणि अभिमानाचे वातावरण आहे.
जिल्हा स्तरावर केंद्र शासनाच्या विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘दिशा’ समितीतून खासदार वाघ या सातत्याने सक्रिय सहभाग घेत असून, प्रत्येक योजनेसाठी त्यांनी दिलेल्या पाठपुराव्यामुळे अनेक योजनांना गती मिळाली आहे. वेळोवेळी संबंधित खात्यांशी समन्वय साधून त्यांनी लोकहिताच्या कामांना चालना दिली आहे.
“खासदार स्मिता वाघ यांची संसदीय कार्यक्षमता आणि केंद्र-राज्य पातळीवर त्यांनी उभा केलेला प्रभावी संवाद खरोखरच कौतुकास्पद आहे. त्यांचा सन्मान म्हणजे संपूर्ण जळगाव जिल्ह्याचा सन्मान आहे,” अशी भावना जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
२०२४ मध्ये जळगाव लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या खासदार वाघ यांनी २०२५ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात १०० टक्के उपस्थिती नोंदवली, २६ चर्चांमध्ये सहभाग घेतला आणि १३० प्रश्न विचारले. त्यांची एकूण उपस्थिती ९६ टक्के असून ती उल्लेखनीय मानली जात आहे.
