पाचोरा | दि.२०( वास्तव पोस्ट न्यूज) -आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर येथील शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाची आढावा बैठक पार पडली. यात पक्षाच्या उमेदवाराला जास्तीत जास्त मताधिक्य मिळवून देण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. लोकसभा निवडणुकीसाठी जळगाव लोकसभा मतदारसंघाची जागा ही शिवसेना-उबाठा पक्षाला सुटली असून याच्या उमेदवारीबाबत येत्या दोन दिवसात अधिकृत निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे. या आधी पक्षाचे जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी आपल्या सहकार्यांसह जळगाव येथे आढावा बैठक घेतली.
या बैठकीच्या प्रारंभी स्थानिक पदाधिकार्यांच्या वतीने पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी मान्यवरांचे स्वागत केले. यानंतर आढावा बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीबाबत नियोजन करण्यात आले. यात प्रामुख्याने बुथ नियोजनासह प्रचार यंत्रणेबाबतही चर्चा झाली. तर वैशालीताई सुर्यवंशी यांनी पाचोरा-भडगाव मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात मताधिक्य मिळवून देण्याची ग्वाही देतांनाच सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे प्रचारात झटून काम करतील असे आवर्जून नमूद केले.
या आढावा बैठकीला पक्षाचे संपर्क प्रमुख संजय सावंत, सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, माजी उपमहापौर कुलभूषण पाटील, युवासेना जिल्हाप्रमुख निलेश चौधरी, वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी, जळगाव महानगराध्यक्ष शरद तायडे, ललीताताई पाटील, नानाभाऊ महाजन आदींसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
