Headlines
Home » जळगाव » जिल्हाधिकारी यांच्याकडून कृषी विभागाला १०६१९ नामंजूर प्रकरणांची फेरतपासणी करण्याच्या सूचना

जिल्हाधिकारी यांच्याकडून कृषी विभागाला १०६१९ नामंजूर प्रकरणांची फेरतपासणी करण्याच्या सूचना

जळगाव, दि .१५ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – जिल्ह्यातील केळीच्या पीक विम्या विषयी ज्यांचे प्रकरण नामंजूर झालेले आहेत त्याबाबत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सूचनेनुसार जिल्हा प्रशासनाने गंभीर दाखल घेतली असून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी कृषी विभागाला १०६१९ नामंजूर प्रकरणांची फेरतपासणी करून अपील पात्र झालेल्या प्रस्तावावर कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत. केळी पीक विम्या बाबत २ फेब्रुवारी रोजी विविध संघटनाकडून मोर्चा काढण्यात आला होता. त्याअनुषंगाने ठरल्याप्रमाणे १४ फेब्रुवारी रोजी शेतकरी संघटना प्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासनाची बैठक झाली. त्यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते.

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सूचनेनुसार जिल्हा प्रशासनाने गंभीर दाखल घेतली असून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी कृषी विभागाला कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

या बैठकीला जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी चंद्रकांत पाटील, मुमराबाद कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ हेमंत बाहेती, बाळासाहेब बाळके, अभिनव माळी, भरत वारे व डी.बी. लोंढे, रावेर, मुक्ताईनगर, यावल व चोपडा या तालुक्याचे कृषी अधिकारी तसेच जिल्हा विमा कंपनी प्रतिनिधी व शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

जिल्ह्यातील एकूण केळी पीक विमा प्रस्तावामध्ये जिल्हयातील १०६१९ प्रस्ताव नामंजूर करण्यात आले आहेत. त्या प्रस्तावांमधील बहुतांश केळी पिकाचे क्षेत्र हे चोपडा, यावल, रावेर, जळगाव व मुक्ताईनगर या तालुक्यातील असल्याने तेथील तालुका कृषि अधिकारी यांना देखील या बैठकीला बोलावण्यात आले होते. त्यानुसार रावेर, यावल, मुक्ताईनगर, जळगाव व चोपडा या तालुक्यात ७९७१ इतक्या शेतकऱ्यांचे पिक विमा प्रस्ताव दाखल करण्यात आलेले असुन त्यापैकी ५२३५ शेतकऱ्यांनी तालुकास्तरीय समितीकडे अपील दाखल केले होते. त्यापैकी ३८५६ अपील पात्र असुन १३७९ अपील अपात्र करण्यात आले आहे.
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी या प्रकरणी लक्ष घालून जिल्हा प्रशासनाला याबाबत पात्र शेतकऱ्यांच्या हक्काची विमा रक्कम मिळावी यासाठी कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Top
error: Content is protected !!