जळगाव l वास्तव पोस्ट वृत्तसेवा
जळगाव : जिल्हा परिषद जळगाव मार्फत सन २०२६ साठी गट-क (वर्ग ३) व गट-ड (वर्ग ४) कर्मचाऱ्यांच्या बदली प्रक्रियेबाबत अधिकृत आदेश जारी करण्यात आला आहे. सामान्य प्रशासन विभागाने संबंधित सर्व विभागप्रमुख व अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी यासंदर्भातील अधिकृत आदेश आणि समुपदेशनाचे वेळापत्रक प्रसिद्ध केले असून, मे महिन्यात विविध विभागांच्या बदल्या पार पडणार आहेत.
शासनाच्या पूर्वीच्या निर्देशांनुसार बदली प्रक्रिया
मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती शाहू महाराज सभागृह, नवीन इमारत, जि.प. जळगाव येथे हे समुपदेशन पार पडेल. प्राप्त आदेशानुसार, शासनाच्या पूर्वीच्या निर्देशांनुसार बदली प्रक्रिया राबविण्यात येणार असून, संबंधित विभागांनी आपल्या अधिनस्त कर्मचाऱ्यांची माहिती व प्रस्ताव निश्चित वेळेत सादर करणे बंधनकारक राहणार आहे. प्रशासकीय सोयीसाठी आणि पारदर्शकतेसाठी विभागनिहाय वेळा निश्चित करण्यात आल्या आहेत.
बदली प्रक्रियेचे वेळापत्रक
परिशिष्ट ‘अ’ मध्ये नमूद केल्यानुसार, दिनांक मे २०२६ मध्ये जिल्हास्तरावर विभागनिहाय बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे.
| वेळ | विभाग | संवर्ग |
|---|---|---|
| सकाळी ११.०० ते १२.०० | सामान्य प्रशासन विभाग | वि.अ.(सा), वाहनचालक, परिचर |
| दुपारी १२.०० ते १.०० | कृषी विभाग | कृषी अधिकारी |
| दुपारी १.०० ते २.०० | अर्थ विभाग | सर्व संवर्ग |
| दुपारी २.०० ते ३.०० | पशुसंवर्धन विभाग | सर्व संवर्ग |
| दुपारी ३.०० ते ५.०० | आरोग्य विभाग | सर्व संवर्ग |
महत्त्वाचे काही मुद्दे
तालुकास्तर बदल्या: तालुकास्तरावरील बदली प्रक्रिया दि. १६ मे २०२६ ते २५ मे २०२६ या कालावधीत राबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
पारदर्शकता: रिक्त पदांची सद्यस्थिती दर्शवण्यासाठी समुपदेशन प्रक्रियेवेळी प्रोजेक्टरचा वापर करण्यात येणार आहे, जेणेकरून कर्मचाऱ्यांना उपलब्ध जागा स्पष्टपणे दिसू शकतील.
उपस्थिती: बदली पात्र कर्मचाऱ्यांनी आपल्या सर्व आवश्यक कागदपत्रांसह संबंधित वेळी उपस्थित राहणे अनिवार्य आहे.
तसेच निर्देशानुसार जणगणनेच्या कामाशी संबंधित जिल्हा परिषदेतील गट-क व गट-ड संवर्गातील (जि.प.तील सर्व शिक्षकांसह) कर्मचाऱ्यांची सन २०२६ ची सर्वसाधारण बदली प्रक्रिया राबविण्यात येवू नये असे निर्देश प्राप्त आहेत.
जिल्हा परिषदेच्या या निर्णयामुळे गेल्या अनेक दिवसांपासून बदल्यांच्या प्रतीक्षेत असलेल्या कर्मचाऱ्यांची धावपळ थांबणार असून, प्रशासकीय कामालाही गती मिळण्याची शक्यता आहे.

