जळगाव ( वास्तव पोस्ट ) : के.सी.ई. सोसायटीचे कॉलेज ऑफ इंजिनीरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात प्रथम वर्ष अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचे आरोग्य तपासणी शिबीर संपन्न झाले. दैनंदीन धावपळीत आपल्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी वेळ नसतो. हीच बाब लक्षात घेत राष्ट्रीय सेवा योजना यांच्या वतीने महाविद्यालयातील विद्यार्थांसाठी भव्य आरोग्य चिकित्सा शिबीर भरवण्यात आलं.
दरम्यान सगळ्याच आरोग्य तपासण्या या एकाच ठिकाणी होत नाहीत. तसेच या तपासणीसाठी मोठ्या प्रमाणात पैसा खर्च तर होतोच, त्यासोबत यात वेळ देखील जातो. या व इतर सर्व बाबींचा विचार करून ‘राष्ट्रीय सेवा योजना’ यांच्या वतीने भव्य आरोग्य चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला आरोग्य तपासणी शिबिराचे उदघाटन महाविद्यालयाचे प्रा.डॉ. संजय सुगंधी, अकॅडमिक डीन डॉ.प्रज्ञा विखार, आरोग्य तपासणी शिबिराचे डॉ. महेंद्र पाटील (श्री साई क्लिनिक जळगाव), प्रा.प्रवीण भंगाळे, प्रा.सचिन नाथ, प्रा.के.बी. पाटील यांचे उपस्थितीत झाले .
डॉ.महेंद्र पाटील यांनी अशा तपासणी शिबिराचे आयोजन आवश्यक व समर्पक असल्याचे सांगितले. तरुणांना, विशेषत: विद्यार्थ्यांना तणाव आणि चिंता यासारख्या समस्यांना सामोरे जाण्याचा धोका जास्त असतो. त्यांनी असेही नमूद केले की, मादक पदार्थांचे सेवन, वर्गात अनियमित उपस्थिती आणि शारीरिक हालचालींचा अभाव यासारख्या घटकांमुळे तणाव, चिंता आणि एकूणच मानसिक आरोग्याची पातळी वाढू शकते आणि त्यामुळे लक्ष केंद्रित करण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो, परिणामी शैक्षणिक कामगिरीमध्ये अडथळा निर्माण होतो.
डॉ. महेंद्र पाटील यांनी विद्यार्थ्यांना प्रतिकूल वर्तनांपासून रोखण्यासाठी आणि कोणत्याही तणाव आणि चिंता कमी करण्यासाठी त्यांच्या शैक्षणिक कार्यात मेहनती आणि प्रामाणिक राहण्यासाठी प्रोत्साहीत केले. योग्य मानसिक आरोग्य राखण्यासाठी वेळेवर काम करणे आणि निरोगी शारीरिक हालचाली करणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे डॉ. महेंद्र पाटील यांनी याप्रसंगी सांगितले.
शिबिरात विद्यार्थ्यांचे मधुमेह, डोळे, दात तपासणे, खोकला, सर्दी, ताप अश्या विविध प्रकारच्या आरोग्य चाचण्या करून त्यांना योग्य ते मार्गदर्शन करण्यात आले. या शिबिरात प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या २०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे प्रा. विजय चौधरी यांनी केले .
