म्हसावद ( वास्तव पोस्ट ) : प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या वतीने म्हसावद पुण्यनगरीत ९० व्या त्रिमूर्ती शिव जयंतीनिमित्त प्रथमच भव्य, दिव्य व ऐतिहासिक स्वरूपाचा आध्यात्मिक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाअंतर्गत अमरनाथ गुहा दर्शन, १२ ज्योतिर्लिंग दर्शन तसेच श्रीमद्भगवद्गीता प्रदर्शनीचे भव्य आयोजन मंगळवार, दि. १० फेब्रुवारी रोजी करण्यात येणार आहे. शिवरात्री महोत्सव कार्यक्रम मंगळवार दि. १० ते १५ फेब्रुवारी पर्यंत चालणार आहे. या कार्यक्रमामुळे म्हसावद परिसरात आध्यात्मिक चेतना, भक्तीभाव आणि सांस्कृतिक जागृतीचा नवा प्रवाह निर्माण होणार असून भाविकांसाठी ही एक अविस्मरणीय आध्यात्मिक अनुभूती ठरणार आहे.

▪️भव्य उद्घाटन सोहळा सकाळी १० वाजता
कार्यक्रमाचा भव्य उद्घाटन सोहळा सकाळी १०.०० वाजता आदरणीय राजयोगीनी ब्रह्माकुमारी मिनाक्षीदीदीजी व सर्व शिवशक्ती समर्पित राजयोग शिक्षका बहिणींच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे. उद्घाटनावेळी आध्यात्मिक संगीत व दीपप्रज्वलनाच्या वातावरणात अमरनाथ गुहा व १२ ज्योतिर्लिंगांच्या दिव्य प्रतिकृतींचे दर्शन भाविकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
▪️बाल लेझीम पथकाची स्वागत मिरवणूक
उद्घाटनापूर्वी सकाळी ९.३० वाजता इंग्लिश मीडियमच्या लहानग्या बालकांच्या लेझीम पथकाद्वारे चौकापासून ब्रह्माकुमारी सेवाकेंद्रापर्यंत भव्य स्वागत मिरवणूक काढण्यात येणार आहे. पारंपरिक लेझीम, घोषवाक्ये आणि भक्तिगीतांच्या माध्यमातून भगवान शिवाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. या मिरवणुकीमुळे संपूर्ण म्हसावद नगरीत भक्ती व उत्साहाचे वातावरण निर्माण होणार आहे.
▪️विशेष अतिथींची उपस्थिती
कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांची प्रेरक उपस्थिती लाभणार आहे. याशिवाय म्हसावाद परिसरातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, भक्तगण व ब्रह्माकुमारी संस्थेचे सेवाभावी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
▪️आध्यात्मिक ज्ञानाचा संगम
अमरनाथ गुहा दर्शन व १२ ज्योतिर्लिंग दर्शनाबरोबरच श्रीमद्भगवद्गीता प्रदर्शनीच्या माध्यमातून जीवनमूल्ये, कर्मयोग, भक्तियोग व राजयोग यांचे सखोल विवेचन करण्यात येणार आहे. प्रदर्शनीद्वारे अध्यात्म, संस्कृती व जीवनशैली यांचा सुंदर संगम सादर करण्यात येणार असून युवक, महिला, वृद्ध व विद्यार्थ्यांसाठी ती विशेष प्रेरणादायी ठरणार आहे.
▪️भाविकांना आवाहन
या भव्य आध्यात्मिक महोत्सवात म्हसावद व परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन ब्रह्माकुमारी संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. हा कार्यक्रम केवळ धार्मिक उत्सव नसून समाजात मूल्यनिष्ठ जीवन, शांती, सद्भावना व आध्यात्मिक जागृती निर्माण करणारा महत्त्वपूर्ण उपक्रम असल्याचे म्हसावद उपसेवाकेंद्र संचालिका ब्र.कु. योजना बहनजी आणि शेंदूर्णी येथील संचालिका ब्रह्माकुमारी दिपा बहनजी यांनी सांगितले.

