मुंबई ( वास्तव पोस्ट ) : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमिवर रस्त्यांविषयीच्या विविध समस्यांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ठाणे, पालघर, नाशिक, रायगड जिल्ह्यातील महामार्गावरील वाहतूक कोंडी, तसेच आगामी गणेशोत्सव कालावधीतील वाहतुकीच्या नियोजनाचा आढावा घेण्यात आला.

ठाणे-नाशिक, मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील खड्ड्यांची तातडीने दुरुस्ती करण्यासाठी रॅपिड क्विक हार्डनर, एम सिक्टी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत असून त्याचे काम प्रगतीपथावर आहे. हे काम तातडीने पूर्ण करून नागरिकांना वाहतूक कोंडीतून दिलासा देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी राष्ट्रीय महामार्ग, एमएसआरडी, सार्वजनिक बांधकाम, वाहतूक पोलिस विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.
दरम्यान नाशिक-भिवंडी रस्त्याच्या दुरुस्तीसाठी युद्ध पातळीवर काम करण्याच्या सूचना देतानाच रस्ते दुरूस्तीच्या कामात अजिबात हयगय करू नका. तसेच गर्दीच्या वेळी अवजड वाहतूकीच्या नियमनासाठी कोकण विभागीय आयुक्तांनी एकत्रित अधिसूचना काढावी, अवजड वाहनांसाठी महामार्गालगत पार्किंग लॉट करावे, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
