माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी अधिकृतरित्या भाजपमध्ये प्रवेश केला आहे. महाराष्ट्र भाजपच्या कार्यालयात हा सोहळा पार पडला.
मुंबई, दि.१३ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपा मध्ये पक्षप्रवेश केला .देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “अशोक चव्हाणांच्या भाजपमध्ये येण्याने भाजप, महायुतीची शक्ती भक्कम झाली आहे.
सविस्तर वृत्त असे की काल अशोक चव्हाण यांनी कॉंग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला . त्यानंतर त्यांची वाटचाल भाजपा मार्गावर झाली . त्यानुसार आज १३ रोजी त्यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला . यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की ,देशभरात पंतप्रधान मोदींनी भारताला विकसित करण्याचं स्वप्न पूर्णत्वाकडे नेण्याचं काम सुरू केलं. जे परिवर्तन देशात दिसू लागलं. त्यामुळे राज्यातील अनेक नेत्यांना मोदींच्या नेतृत्त्वात काम करावं, आपणही यात वाटा उचलावा असा विचार आला. यात अशोक चव्हाण सुद्धा आहेत. त्यांनी केवळ एवढेच सांगितले की विकासाच्या योग्य धारेत काम करण्याची संधी द्या. माझी कुठलीच लालसा नाही असं त्यांनी सांगितलं.”
भाजपमध्ये सकारात्मक दृष्टीने काम करणार : चव्हाण भाजप प्रवेशावेळी अशोक चव्हाण म्हणाले की, “राजकारणाच्या पलिकडे आम्ही आतापर्यंत एकमेकांना साथ दिलेलीआहे. मी माझ्या आयुष्याची नवी सुरुवात करत आहे. ३८ वर्षांचा माझा राजकीय प्रवास राहिलेला आहे. मोदींच्या कामातून प्रेरणा घेऊन मी राज्यात काम करण्यासाठी पक्षात प्रवेश करत आहे. मी जिथे राहिलो तिथे आजपर्यंत काम केलेले आहे. आगामी निवडणुकीत जास्तीत जास्त जागेवर यश मिळेल यासाठी प्रयत्न करणार आहे,” असं अशोक चव्हाण म्हणाले. मला कोणावरही वैयक्तिक टिप्पणी करायची नाही आणि मला कोणावरही दोषारोपही करायचे नाहीत, असेही अशोक चव्हाण म्हणाले.
अशोक चव्हाण यांच्या भाजपात जाण्याने महाराष्ट्रात येत्या लोकसभेच्या निवडणुकीत मराठवाड्यात महायुतीला विशेष बळ मिळणार आहे . यावेळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार तसेच नांदेडचे खासदार प्रताप चिखलीकर, भाजप नेते हर्षवर्धन पाटील हेही उपस्थित होते.
