मुंबई दि. ०९ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – आज पुण्यात ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्याकडून ‘निर्भय बनो’ या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं . पण ते कार्यक्रम स्थळी रस्त्याने आपल्या गाडीतुन जात असतांना त्यांच्या गाडीवर भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला करून गाडीच्या काचा फोडल्या. या हल्ल्यात त्यांच्या गाडीवर दगडफेकही करण्यात आली . या सर्व घटनेवर आता पुणे पोलिसांची तसेच राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीदेखील प्रतिक्रिया आली आहे. निखिल वागळे यांनी केलेल्या वादग्रस्त ट्विटमुळे भाजप कार्यकर्त्यांनी आधीच त्यांचा कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर त्यांच्या गाडीवर हल्ल्याची घटना घडली. फडणवीसांनी या घटनेनंतर हल्ला करणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
“कायदा आणि सुव्यवस्था कुणीही हातामध्ये घेऊ नये. मग ते कुणीही असो, भाजपचा असो किंवा इतर कुणीही असो, आम्ही त्याच्यावर कारवाई करुच. पण त्याचवेळी लोकांच्या भावना भडकतील अशा प्रकारची वक्तव्ये करणं देशाच्या सर्वोच्च नेत्यांना अतिशय खालच्या स्तरावर जाऊन बोलणं हे देखील अत्यंत चुकीचं आहे. तथापि हे कितीही चुकीचं बोलले तरी कायदा आणि सुव्यवस्था राखणं हे पोलिसांचं काम आहे. ते पोलीस चोखपणे करतील”, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
गाडीवरील हल्ल्यानंतर पोलिसांची प्रतिक्रिया
या घटनेवर पुणे पोलिसांनीदेखील प्रतिक्रिया दिली आहे , “आज इकडे कार्यक्रम होता. कार्यक्रमासाठी आज इथे पोलीस बंदोबस्त लावलेला होता. सहा वाजेपासून कार्यक्रम सुरु देखील झाला होता. निखिल वागळे इथे येणार होते. त्यांच्याशी आम्ही बातचित केली होती. पण इथली परिस्थिती हाताळल्यानंतर ते इकडे येत होते. ट्राफीकमधून येत असताना त्यांच्या गाडीच्या मागेपुढे पोलीस होते. पण येत असताना काही जणांनी त्यांच्या गाडीवर शाई फेकली आणि पाठीमागून दगड फेकले आहेत. त्या संदर्भात आम्ही गुन्हे दाखल करु आणि सगळ्यांवर कारवाई करु”, अशी प्रतिक्रिया पोलिसांनी दिली.
