दिल्ली, दि.१३ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – देशातील शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा आपल्या मागण्यांसाठी दिल्लीकडे कूच केली आहे. केंद्र सरकारकडे आपल्या मागण्या मांडण्यासाठी आजपासून ‘दिल्ली चलो’ मोर्चा सुरू केला आहे. पिकाच्या किमान भावाची मागणी करणाऱ्या हजारो आंदोलक शेतकऱ्यांना दिल्लीवर मोर्चा काढण्यापासून रोखण्यासाठी उत्तर भारतातील पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या आहेत. विरोध रोखण्यासाठी राजधानीला रेझर वायर, सिमेंट ब्लॉक्स आणि तीन बाजूंनी कुंपण घालण्यात आले आहे. दोन वर्षे उलटली तरी इतर मागण्या पूर्ण झाल्या नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. शेतकरी संघटनेचे नेते आणि केंद्रीय मंत्री यांच्यातील चर्चेच्या दोन फेऱ्या आत्तापर्यंत अयशस्वी ठरल्या आहेत.
मोर्चात २०० हून अधिक शेतकरी संघटना सहभागी झाल्या आहेत. पंजाब किसान मजदूर संघर्ष समितीचे सरचिटणीस सर्वन सिंग पंधेर यांनी वृत्तसंस्थेला सांगितले की, “आम्ही शांततेने वाटचाल करू आणि सरकार आमच्या मागण्या ऐकून घेईल हा आमचा उद्देश आहे.” शेतकरी आणि कामगार संघटनांनी १६ फेब्रुवारी रोजी ग्रामीण संपाचीही घोषणा केली असून त्यादरम्यान कोणतीही कृषी कामे केली जाणार नाहीत. सर्व गावातील दुकाने, बाजारपेठा आणि कार्यालये बंद राहतील तर शेतकरी देशभरातील प्रमुख रस्ते रोखतील.
