मुंबई l वास्तव पोस्ट न्यूज नेटवर्क
राज्याचे दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. मात्र, या प्रकरणाचा तपास केवळ अपघाताच्या अँगलने होत असल्याचा आरोप करत आमदार रोहित पवार यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. महाराष्ट्रात गुन्हा दाखल होत नसल्याने अखेर रोहित पवार यांनी कर्नाटक गाठले आणि तिथल्या बेंगळुरू पोलिसांनी या प्रकरणी ‘झिरो एफआयआर’ दाखल केला आहे.
काय आहेत आरोप?
रोहित पवार यांनी दाखल केलेल्या ६६ पानांच्या तक्रारीत खळबळजनक दावे केले आहेत:
१. विमानाची स्थिती: अपघाती विमान (VT-SSK) निकामी अवस्थेत होते. विमानाने प्रत्यक्षात ८,००० पेक्षा जास्त तास उड्डाण केले होते, मात्र कागदपत्रांवर ते कमी दाखवण्यात आले.
२. सुरक्षेचे उल्लंघन: वैमानिकाचा जुना रेकॉर्ड आणि विमानातील इंधनाच्या अतिरिक्त टाक्यांबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.
३. मोठे षडयंत्र: हा केवळ अपघात नसून अजित पवारांना संपवण्याचे मोठे ‘गुन्हेगारी षडयंत्र’ असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
महाराष्ट्र पोलिसांची जबाबदारी वाढली
कर्नाटक पोलिसांनी हा तपास आता महाराष्ट्र पोलिसांच्या महासंचालकांकडे सोपवला आहे. “महाराष्ट्रात न्याय मिळत नसल्याने आम्हाला शेजारच्या राज्यात जावे लागले, ही खेदजनक बाब आहे. आता तरी महाराष्ट्र पोलिसांनी निष्पक्ष आणि पारदर्शक तपास करावा,” अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे.
या प्रकरणात आता कोणती ‘मोठी शक्ती’ समोर येते आणि तपास कोणत्या दिशेला जातो, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
– वास्तव पोस्ट ब्युरो
