धर्मशाला ( वास्तव पोस्ट ) : भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुरू असलेल्या लष्करी कारवाईदरम्यान, धर्मशाला येथे खेळला जाणारा पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामना सुरक्षिततेच्या कारणामुळे मधेच थांबविला आणि काही वेळाने तो रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. मैदानावरील फ्लडलाईट्स पहिल्यांदा ९:२९ मिनिटांनी बंद करण्यात आले. यानंतर, खेळाडू आणि प्रेक्षक मैदानाबाहेर जायला निघाले. तथापि, सामना अधिकाऱ्यांनी कोणताही विलंब न करता सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला.
गुरुवारी रात्री ८.३० च्या सुमारास पाकिस्तानने जम्मूला लक्ष्य करून ड्रोन हल्ला केला. पाकिस्तान कडून होणाऱ्या या कारवाईस भारतीय हवाई संरक्षण तोफा प्रत्युत्तर देत आहेत. यासोबतच पाकिस्तानकडून ड्रोन वापरून अनेक सीमावर्ती भागात हल्ले करण्यात आले. हल्ल्यानंतर, धर्मशाळेत खबरदारीचा उपाय म्हणून खेळाडू आणि पंचांना मैदानाबाहेर काढण्यात आले आणि फ्लडलाईट्स देखील बंद करण्यात आले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता, सामना आता रद्द करण्यात आला असून दोन्ही संघास प्रत्येकी एक-एक गुण देण्यात आला.
दरम्यान या सामन्यात पंजाब किंग्जने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सामना थांबवला तेव्हा पंजाब फलंदाजी करत होता आणि १०.१ षटके खेळली गेली होती. पंजाबने एक विकेट गमावल्यानंतर १२२ धावा करून भक्कम स्थितीत होता. पंजाबकडून प्रियांश आर्य आणि प्रभसिमरन सिंग यांनी पहिल्या विकेटसाठी १२२ धावांची भागीदारी केली. प्रियांश ३४ चेंडूत ७० धावा काढून बाद झाला तर प्रभसिमरन ५० धावा काढून नाबाद राहिला.
