T20 World Cup 2024: टी-२० विश्वचषक २०२४ मधील २४ व्या सामन्यात भारतीय संघाने अमेरिकेवर विजय मिळवत सुपर८ फेरीत प्रवेश केला आहे. भारताचा अमेरिकेवरील विजय हा गट टप्प्यातील सामन्यांमधील टीम इंडियाचा सलग तिसरा विजय होता.
जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : टी-20 विश्वचषक क्रिकेट सामन्यात प्रबळ दावेदार असलेल्या टीम इंडियाने यूएसएवर ७ गडी राखून विजय मिळविला. सलग तिसऱ्या विजयासह टीम इंडियाने सुपर आठ च्या फेरीत दिमाखात प्रवेश केला. विजयासाठी मिळालेलं १११ धावांचे लक्ष हे ३ विकेट्स गमावून १० चेंडू शिल्लक असताना पूर्ण केले. टीम इंडियाने १८.२ षटकामध्ये ३ बाद १११ धावा केल्या. सूर्यकुमार ने ५०* आणि शिवम दुबे याने ३१* धावा केल्या. दोघेही नाबाद राहीलेत.
त्याआधी भारताने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्विकारले. अर्शदीप सिंह याने डावाच्या पहिल्याच चेंडूवर विकेट घेत यूएसए च्या डावाला खिंडार पाडले. अर्शदीपने पहिल्या षटकात २ बळी घेतले. त्याने या सामन्यात एकूण ४ गडी बाद केले. ठराविक अंतरावर गडी बाद होत गेल्यामुळे यूएसएला ११० धावांवर रोखण्यात टीम इंडियाला यश आले. अर्शदीपला त्याच्या या कामगिरीसाठी मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आले.
दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलियानंतर टीम इंडियाने सुपर8 मध्ये पोहचणारी तिसरी टीम ठरली आहे. आता पुढील काही सामन्यांमध्ये उर्वरित ५ जागांसाठी एकूण ४ गटातील संघांमध्ये जोरदार चुरस पाहायला मिळणार आहे. टीम इंडियाच्या सुपर8 मधील प्रवेशासह या फेरीतील सामनाही निश्चित झाला आहे. टीम इंडियाचा सुपर8 मधील सामना हा आता ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणार आहे.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया आमनेसामने
दरम्यान टीम इंडिया कॅनडा विरुद्ध १५ जून रोजी आपल्या साखळी फेरीतील अखेरचा सामना खेळणार आहे. टीम इंडियाची सुपर8 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध लढत होणार आहे. टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना हा २४ जून रोजी डॅरेन सॅमी राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, सेंट लूसिया येथे होणार आहे.
या सामन्याला भारतीय वेळेनुसार रात्री ८:०० वाजता सुरुवात होणार आहे. भारत ऑस्ट्रेलिया संघात झालेले मागील काही सामने बघता भारत आणि पाकिस्तान या दोघांमध्ये होणाऱ्या सामन्यापेक्षाही अधिक थरार भारत ऑस्ट्रेलिया संघा दरम्यान होणाऱ्या या सुपर8 च्या सामन्यात बघायला मिळणार आहे.
