Home » जळगाव » उच्च शिक्षणात नवीन बदलांची नांदी ठरेल यूजीसी मसुदा – २०२५

उच्च शिक्षणात नवीन बदलांची नांदी ठरेल यूजीसी मसुदा – २०२५

अमळनेर ( वास्तव पोस्ट ) : “उच्च शिक्षणामध्ये काळाशी सुसंगत असे बदल होणे गरजेचे आहे. याचाच भाग म्हणून सरकारने राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० लागू केले आहे. या धोरणाला पूरक असे काही महत्वाचे बदल व्हावेत यासाठी नुकताच ‘यूजीसी मसुदा -२०२५’ प्रस्तावित करण्यात आला आहे. विविध तज्ञ मंडळीच्या गहन चिंतनमंथनातून या मसुद्यात नवीन बाबी समाविष्ट करण्यात आल्या आहेत. या मसुद्यातील विविध विषया संदर्भात साधक बाधक चर्चा करण्यासाठी सदर कार्यशाळा महत्त्वाची ठरेल.” असे मत अभिजित भांडारकर, (अध्यक्ष, श्रमसाफल्य एज्यू. शै.सोसायटी, अमळनेर) यांनी प्रकट केले. ते पं.जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालयात आयोजित कार्यशाळेमध्ये उद्घाटक म्हणून बोलत होते.

आज जळगाव येथील एन.मुक्ता. प्राध्यापक संघटना आणि पंडीत जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय, अमळनेर यांच्या वतीने ‘यूजीसी मसुदा -२०२५’ विषयावर क.ब.चौ. उ.म.विद्यापीठ परिक्षेत्रातील प्राध्यापकांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

उच्च शिक्षणातील ध्येय धोरणे ठरवणारी संस्था विद्यापीठ अनुदान आयोग, नवी दिल्ली यांनी उच्च शिक्षण संस्थांमधील काही महत्वाची धोरणे लागू करण्या अगोदर प्रस्तावित असा ‘यूजीसी मसुदा -२०२५’ जाहीर केला आहे आणि त्यावर विविध सूचना मागविण्यात आल्या आहेत. यासाठी आयोजित कार्यशाळेतील प्रथम सत्रामध्ये जळगाव येथील एस.एस.मणियार विधी महाविद्यालयाच्या डॉ.विजेता सिंग यांनी मसुद्यातील प्राध्यापक भरती प्रक्रिया, प्राध्यापकांची पदोन्नती प्रक्रिया आणि विद्यापीठांमधील कुलगुरू निवड प्रक्रिया या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच द्वितीय सत्रामध्ये म.गांधी वरिष्ठ महविद्यालय, चोपडा येथील डॉ.लालसिंग पटले यांनी सदर मसुद्यामधील विभागवार अध्यापक संरचना, शैक्षणिक नैतिक मूल्ये, विद्यापीठ आणि महाविद्यालयातील शिक्षकांच्या सुट्ट्या या संदर्भात प्रबोधन केले.

या कार्यशाळेचे अध्यक्ष आणि एन.मुक्ता. संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष डॉ. नितीन बारी यांनी ‘यूजीसी मसुदा-२०२५’ संदर्भातील काही तरतुदी कशा उपयोगी आहेत आणि काही मुद्दे उच्च शिक्षण व्यवस्थेत असे घातक ठरतील यावर सविस्तर भाष्य केले. तसेच या कार्यशाळेत सहभागी प्राध्यापकांच्या सूचना आणि हरकती ह्या यूजीसी ला लिखित स्वरूपात आणि ईमेल वर पाठवण्यात येतील, असे सांगितले.

या कार्यशाळेच्या समारोप सोहळ्याचे प्रमुख पाहुणे विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.शिवाजी पाटील हे होते. सदर कार्यशाळेचे प्रास्ताविक एन.मुक्ता. संघटनेचे सचिव डॉ.पवन पाटील यांनी केले. तर सूत्रसंचालन समाजकार्य महाविद्यालयाच्या प्रा.अस्मिता सरवैया यांनी केले. विविध सत्रांचे समन्वयक डॉ.नितीन बडगुजर आणि डॉ.हरीश चौधरी हे होते आणि आभार डॉ.विजय लोहार यांनी प्रकट केले.

या कार्यशाळेसाठी समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी. एस.पाटील, कार्यशाळा समन्वयक डॉ.एस.आर. चव्हाण, डॉ.धीरज वैष्णव, प्राचार्य डॉ.एस.आर.पाटील, प्राचार्य डॉ.व्ही.आर.पाटील, प्राचार्य डॉ.विष्णू गुंजाळ, प्राचार्य डॉ.सुनील बाविस्कर, प्राचार्य, डॉ.शेख, डॉ.मोहिनी उपासनी, डॉ.कांचन महाजन, डॉ.दिनेश नाईक, डॉ.एस.आर.शेलार, डॉ.विजय शिरसाठ, प्रा.विजयकुमार वाघमारे डॉ.वंदना जोशी, डॉ.भरत खंडागळे, डॉ.जगदीश सोनवणे, प्रा.धनराज ढगे, डॉ.संजय शिंगणे इत्यादी प्राध्यापक मंडळींचे सहकार्य लाभले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!