नाशिक दि. ६ ( प्रतिनिधी ) – नाशिक परिक्षेत्राचे तत्कालीन विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर-पाटील यांनी नुकत्याच झालेल्या बदलीमुळे केंद्रीय प्रशासनिक न्यायाधिकरणात धाव घेतली आहे. सेवानिवृत्तीस चार महिने बाकी असताना तसेच कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच गृह विभागाने बदली केल्याने त्यांनी ही याचिका दाखल केल्याचे समजते.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गृह विभागाने राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यात डॉ. शेखर पाटील यांची बदली करीत त्यांच्या जागी ठाणे शहराचे तत्कालीन सहआयुक्त दत्तात्रय कराळे यांची नियुक्ती करण्यात आली. तर डॉ. पाटील यांची पुणे मोटार परिवहन विभागात नियुक्ती करण्यात आली. परंतु, या बदलीविरोधात डॉ. पाटील यांनी दाखल केली आहे.
डॉ. पाटील यांची एप्रिल २०२२ मध्ये नाशिक परिक्षेत्रात बदली झाली होती. त्याच वर्षी त्यांच्या बदलीचे आदेश आले होते, मात्र ते स्थगित करण्यात आले. त्यानंतर डॉ. पाटील यांची जानेवारी २०२४ मध्ये बदली करण्यात आली आहे. मात्र दोन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच तसेच मे अखेरीस सेवा सेवनिवृती असतांना देखील बदलीचे आदेश निर्गमित केल्याचा दावा डॉ पाटील यांनी याचिकेत केल्याचे समजते .
या याचिकेवर सोमवारी दि.५ रोजी सुनावणी झाली असुन १२ फेब्रुवारीपर्यंत या याचिकेवरील अंतिम निकाल येण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, नाशिक परिक्षेत्राची सूत्रे नवनियुक्त विशेष महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी तीन दिवसांपूर्वीच हाती घेतली आहे. त्यामुळे निकालाकडे पोलिसांचे लक्ष लागले आहे.
