विशाखापट्टणम दि .२ ( प्रतिनिधी ) – इंग्लंड विरुद्धच्या ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील आज दि .२ रोजी दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय सलामीवीर यशस्वी जैस्वालच्या नाबाद १७९* धावांच्या जोरावर ६ गड़ी बाद ३३६ धावांपर्यंत मजल मारली . जैस्वाल ने आपल्या कारकिर्दीतील दुसरे शतक झळकावले.
शुक्रवारी विशाखापट्टणम येथील वायएस राजशेखर रेड्डी क्रिकेट स्टेडियमवर भारतीय संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला, पण सलामीला आलेल्या भारतीय कर्णधाराला हा निर्णय योग्य दाखवता आला नाही. संघाच्या ४० धावा फलकावर लागल्या असतांना तो १४ धावा करून बाद झाला. पदार्पण करणारा गोलंदाज शोएब बशीरने त्याला ऑली पोपकरवी झेलबाद केले.
जैस्वाल व्यतिरिक्त एकही फलंदाज मोठी धावसंख्या उभारू शकला नाही . केएस भरत (१७ धावा), अक्षर पटेल (२७ धावा), पदार्पण करणारा रजत पाटीदार ३२, श्रेयस अय्यर २७, शुभमन गिल ३४ आणि कर्णधार रोहित शर्मा १४ धावा करून बाद झाले. शोएब बशीर आणि रेहान अहमदने प्रत्येकी दोन गडी बाद केले. टॉम हार्टले आणि अँडरसनने प्रत्येकी एक विकेट घेतली.
