जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : ‘‘भाऊ बहिणीचे नाते हे घरात असते, राजकारणात नाही. आज पराभवाच्या भितीने ते काहीही अफवा पसरवत असले तरी आमच्यात कोणतीही सेटींग होणार नसून पाचोर्यातून मी लढून जिंकणारच !” असे ठाम प्रतिपादन शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी केले. त्या जळगावात महाविकास आघाडीच्या वतीने आयोजीत धरणे आंदोलनात बोलत होता.
दुध उत्पादकांना अनुदान मिळावे, शेतकर्यांना पीक विम्याचा लाभ मिळावा यासह विविध मागण्यांसाठी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आज महाविकास आघाडीच्या वतीने माजी खासदार उन्मेषदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. पाचोरा-भडगाव मतदारसंघातील शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी या आपल्या सहकार्यांसह सदर आंदोलनात सहभागी झाल्या.
याप्रसंगी प्रसारमाध्यमांशी बोलतांना वैशालीताई सुर्यवंशी यांनी सत्ताधार्यांवर जोरदार टिकास्त्र सोडले. पाचोर्यातून बहिण-भावात लढत नक्की आहे का ? असा प्रश्न विचारला असता त्या म्हणाल्या की, होय हे नक्की आहे. बहिण-भावाचे नाते हे घरात असले तरी राजकारण व सामाजिक लढाईत नसते. मी मातोश्रीवर गेले असतांना उध्दव ठाकरे साहेबांनी पहिल्याच भेटीत मला तयारीला लागण्याचे आदेश दिले असून या अनुषंगाने माझी तयारी सुरू असून या लढाईत आपण विजय मिळवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, आमदारांनी केलेल्या आरोपांबाबत विचारणा केली असता वैशालीताई म्हणाल्या की, त्यांनी अतिशय घाणेरडे आणि खालच्या स्तरांचे आरोप केले असून देखील मी त्या मार्गावरच नसल्याने याला उत्तर दिले नाही. माझे वडील तात्यासाहेबांनी कधीही खालचे राजकारण केले नाही. आमदारांनी केलेले आरोप बिनबुडाचे केले असून आरोप करणार्यांनी आधी स्वत:चा चेहरा आरशात पहावा असा टोला त्यांनी मारला. तर माझ्याबाबत अफवा पसरवत जात असल्या तरी आमच्यात कोणत्याही प्रकारची ‘सेटींग’ होणार नसून महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून आपण विधानसभा लढविणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
लोकसभा निवडणुकीत महायुतीचा आधीचा लीड हा मोठ्या प्रमाणात कमी झाला असून विधानसभेत तर तो आमच्या बाजूने वाढलेला असेल. मी निवडणूक लढणार आणि जिंकणारच असा आशावाद याप्रसंगी वैशालीताई सुर्यवंशी यांनी व्यक्त केला.
या आंदोलनात खा. उन्मेषदादा पाटील, माजी मंत्री डॉ. सतीश पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, जिल्हा सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, जिल्हाप्रमुख डॉ. हर्षल माने, माजी महापौर जयश्रीताई महाजन, महानगर प्रमुख शरद तायडे, जिल्हाप्रमुख दीपकसिंग परदेशी यांच्यासह पाचोरा मतदारसंघातील उपजिल्हा प्रमुख उध्दव मराठे, दीपक आधार पाटील, तालुका प्रमुख शरद पाटील, योजनाताई पाटील आदींसह मान्यवर सहभागी झाले होते. याप्रसंगी जिल्ह्यातील शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी कॉंग्रेस-शरदचंद्र पवार पक्ष, कॉंग्रेस आदी घटक पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
