जळगाव | दि.१० ( वास्तव पोस्ट न्यूज ) – जळगाव तालुक्यातील लमांजन शिवारात एका शेतातून गेलेल्या विज तारांच्या शॉर्ट सर्किटमुळे ठिणगी पडून शेतामध्ये आग लागली. या आगीत शेतातील पिक आणि चारा जळून खाक झाला असून त्यात शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.
सविस्तर वृत्त असे की लमांजन शिवारात हिलाल पाटील यांच्या शेतातून गेलेल्या विद्युत तारा ह्या बऱ्याच महिन्यांपासून लोंबकळत होत्या. सदर शेतकऱ्याने काही महिन्यापूर्वी म्हणजे २५ नोव्हेंबर रोजी याबाबत एक पत्र म्हसावद सबस्टेशन येथील सहाय्यक अभियंत्यास देऊन त्यात शेतातुन गेलेल्या लोंबकळणाऱ्या तारांपासून पिकास तसेच जिवितास धोका असून तारांची दुरुस्ती त्वरीत करण्यात यावी, याबाबत विनंती केली होती. परंतु पाच महीने उलटून देखील महावितरणाने या शेतकऱ्याच्या अर्जावर कोणतीही कार्यवाही केली नाही.


महावितरणाच्या ह्या भोंगळ कारभारामुळे शेतकऱ्याचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. वेळीच ह्या तारांना तणाव देऊन वर केल्या असत्या तर आज शेतकऱ्याचे पीक व चारा जळून खाक झाला नसता. या आगीमध्ये शेतकऱ्याचे कापसाचे पिक, दादारची कणसे आणि चारा इ. जळून खाक झाला. या आगीमुळे परिसरातील तसेच तालुक्यातील शेतकरी व सामान्य जनतेतुन संताप व्यक्त केला जात आहे. आगीमुळे झालेल्या नुकसानाचा पंचनामा करुन शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी लमांजन ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे.
