नवी दिल्ली | दि.०९ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – लोकसभा २०२४ च्या निवडणुकीचा कार्यक्रम पुढील आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता असतानाच निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांनी आज तडकाफडकी आपला राजीनामा दिला. त्यांचा राजीनामा महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वीकारला आहे. गोयल यांच्या अचानक दिलेल्या राजीनाम्यामुळे देशभरात खळबळ उडाली आहे.
अरुण गोयल यांनी दिलेला राजीनामा मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त (नियुक्ती, सेवाशर्ती आणि पदाचा टर्म) कायदा, २०२३ च्या कलम ११ च्या खंड (1) नुसार, स्वीकारण्यात आला आहे. फक्त १५ महिने पदावर राहिल्यानंतर गोयल यांनी अचानक राजीनामा दिला. गोयल यांच्या राजीनाम्याने आता संपूर्ण निवडणूक यंत्रणेवर देखरेख ठेवण्याची जबाबदारी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्यावर आली आहे.
अरुण गोयल हे पंजाब केडरचे माजी IAS अधिकारी यांनी १८ नोव्हेंबर २०२२ रोजी सेवा निवृत्ती घेतली होती. आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी गोयल यांची आयोगात नियुक्ती करण्यात आली होती. गोयल यांच्या नियुक्तीला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने सर्व काही फार वेगाने करण्यात आले अशी टिप्पणी केली होती. त्यांनी १ नोव्हेंबर २०२२ रोजी निवडणूक आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारला होता. त्यांचा कार्यकाळ २०२७ मध्ये संपणार होता. मात्र त्यांनी लोकसभेच्या तोंडावरच राजीनामा दिल्याने खळबळ उडाली आहे. यापूर्वी गोयल यांनी अवजड उद्योग मंत्रालयात सचिव म्हणून काम केले होते.

लोकसभेचा सार्वत्रिक निवडणुक तोंडावर असताना अरुण गोयल यांनी निवडणूक आयुक्त पदाचा
राजीनामा देणे ही गंभीर बाब आहे. त्यांच्या राजीनाम्याची करणे लवकरच समोर येतील. खरे
तर आयुक्तांनी राजीनामा देताना त्याची कारणे
सांगणे आवश्यक होते. कारण संविधानिक
पदावरील व्यक्तींची ही नैतिक जबाबदारी होती.
त्यांच्या राजीनाम्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होतात. निवडणूक आयोगावर काम करताना
सरकारचा हस्तक्षेप आहे का ? आयोगवर सरकारचा दबाव आहे का? तो सरकारच्या
दबावाला बळी पडत आहे का? निवडणुकांच्या तारखा, टप्पे याबाबत आयोगाचे अध्यक्ष आणि इतर आयुक्त यांच्यात मतभेद आहेत का?
आयुक्तांवर काम करताना/ निर्णय घेताना सरकारचा दबाव आहे का? निर्णय घेताना त्यांच्यात टोकाचे मतभेट आहेत का ? EVM मधील हेराफेरी आज ना उद्या उघड झाल्यावर आपल्याला त्रास होण्यापेक्षा या पापापासून आधीच बाहेर पडलेले बरे असे वाटले का ? असे असंख्य प्रश्न उभे राहिले आहेत.
निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यामुळे आयोगात सर्व काही आलबेल नाही, येवढे मात्र नक्की.