मुंबई | दि.०३ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – क्रिकेट वर्तुळातून या क्षणाची सर्वात मोठी आणि वाईट बातमी समोर आली आहे. ज्यामुळे क्रिकेट विश्वावर शोककळा पसरली आहे. राजस्थानसाठी रणजी क्रिकेट खेळणाऱ्या माजी खेळाडू रोहित शर्मा याचं निधन झालं. रोहित शर्मा याच्या निधनामुळे अनेक युवा खेळाडू आणि सहकाऱ्यांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे. रोहितने राजस्थानचं ७ रणजी सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं होतं. त्याशिवाय रोहित २८ एकदिवसीय रणजी सामने आणि ४ टी २० सामनेही खेळला होता.
रोहितच्या नावाने जयपूरमध्ये आरएस अकादमीही होती. सोशल मीडियावर रोहित शर्माच्या निधनाची अर्धवट माहिती व्हायरल झाली आहे, ज्यामुळे टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा याचं निधन झाल्याचा गैरसमज अनेक क्रिकेट चाहत्यांचा झालाय. मात्र निधन झालेला रोहित शर्मा हा राजस्थानचा आहे.
मिळालेल्या माहितीनुसार रोहित शर्मा याची वयाच्या ४० व्या वर्षी प्राणज्योत माळवली. रोहित गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होता. अखेर शनिवारी २ मार्च रोजी रोहितने जगाचा निरोप घेतला. रोहित राजस्थानच्या आक्रमक फलंदाजांपैकी एक होता.
