Headlines
Home » कृषी » केळीच्या दराचा तिढा सुटणार; जळगाव जिल्हा प्रशासनाचा मोठा पुढाकार

केळीच्या दराचा तिढा सुटणार; जळगाव जिल्हा प्रशासनाचा मोठा पुढाकार

रावेर l वास्तव पोस्ट वृत्तसेवा

जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना सातत्याने मिळणारा कमी भाव आणि त्यातून निर्माण होणाऱ्या तक्रारींची दखल घेत जिल्हा प्रशासनाने आता कंबर कसली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार रावेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (१ एप्रिल) एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. केळी अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रशासनाने अनेक धाडसी निर्णय या बैठकीत घेतले आहेत.

प्रमुख बाजार समित्यांचा सहभाग

या बैठकीला रावेरसह यावल, चोपडा, मुक्ताईनगर बाजार समितीचे पदाधिकारी, केळी व्यापारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेष म्हणजे, शेजारील मध्य प्रदेशातील बुऱ्हाणपूर बाजार समितीच्या सचिवांनाही निमंत्रित करण्यात आले होते. जिल्हा उपनिबंधक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, फैजपूरचे उपविभागीय अधिकारी आणि रावेरचे तहसीलदार यांनी या चर्चेत समन्वयाची भूमिका बजावली.

जिल्हाभर एकच दर : नवी समिती स्थापन होणार

बैठकीत सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे, केळी उत्पादक क्षेत्रातील प्रतिनिधींची एक स्वयंस्फूर्त समिती स्थापन करण्यात येणार आहे.
या समितीत शेतकरी, व्यापारी आणि बाजार समितीचे संचालक यांचा समावेश असेल.
ही समिती सर्व घटकांचा विचार करून जिल्ह्यातील केळीचे सर्वसाधारण दर निश्चित करेल.
हे दर संपूर्ण जिल्ह्यासाठी लागू राहतील आणि त्यांना व्यापक प्रसिद्धी दिली जाईल, जेणेकरून दरात पारदर्शकता येईल.

‘एक खिडकी’ योजनेतून २४x७ मदत

शेतकऱ्यांच्या सोयीसाठी रावेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ‘एक खिडकी’ कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. या कक्षात सर्व निर्यातदार आणि व्यापाऱ्यांची यादी व संपर्क क्रमांक शेतकऱ्यांसाठी २४ तास उपलब्ध असतील. यामुळे कटाई किंवा दराबाबतच्या अडचणींचे निराकरण तात्काळ होण्यास मदत होईल. तसेच, बुऱ्हाणपूर येथील लिलावाच्या पावत्यांची माहिती आता जळगाव जिल्ह्यातील पंचायत समित्यांमध्येही उपलब्ध करून दिली जाणार आहे.

प्रशासकीय भूमिका

“केळी उत्पादक शेतकऱ्यांचे हित जोपासणे हे आमचे प्रथम प्राधान्य आहे. पारदर्शक लिलाव प्रक्रिया आणि परस्पर समन्वयातून शेतकऱ्यांना योग्य भाव मिळवून देण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे,” अशी ग्वाही जिल्हा प्रशासनाने यावेळी दिली.

या निर्णयामुळे जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादकांमध्ये समाधानाचे वातावरण असून, दराबाबतची अनिश्चितता संपण्याची चिन्हे दिसत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!