Headlines
Home » महाराष्ट्र » कल्याण प्रकरण ; कुठल्याही परिस्थितीत मराठी माणसांवर अन्याय होऊ देणार नाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कल्याण प्रकरण ; कुठल्याही परिस्थितीत मराठी माणसांवर अन्याय होऊ देणार नाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर ( वास्तव पोस्ट ) : कल्याण येथील सोसायटीमध्ये मराठी माणसांवर झालेल्या हल्ल्या प्रकरणी राज्य शासनाने गंभीर दखल घेतली असून दोषींवर गुन्हा दाखल करण्यात आले असून कारवाई सुरू आहे. मुंबई ही मराठी माणसांची आहे. कुठल्याही परिस्थितीत मराठी माणसांवर अन्याय होऊ देणार नाही असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत सांगितले.

कल्याणमधील मराठी कुटुंबावर झालेल्या हल्ल्या प्रकरणी विधानपरिषद सदस्य ऍड. अनिल परब यांनी मांडलेल्या विधानपरिषद नियम २८९ अन्वये चर्चेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले. या चर्चेत विधानपरिषद सदस्य सर्वश्री ऍड. परब, शशिकांत शिंदे, अरुण उर्फ भाई जगताप, सचिन अहिर यांनी सहभाग घेतला.

मुख्यमंत्री शदेवेंद्र फडणवीस म्हणाले की, कल्याण येथील एका सोसायटीत अखिलेश शुक्ला व त्याच्या पत्नीने भांडणात मराठी माणसाचा अवमान केला. या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आले आहे. शुक्ला हा एमटीडीसी चा कर्मचारी असून त्याला निलंबित करण्याची कारवाई सुरू आहे.

महाराष्ट्र, मुंबई ही मराठी माणसाची आहे. मुंबई ही आर्थिक राजधानी असल्याने येथे देशभरातील लोकं येथे येत असतात आणि ते येथे शांततेने राहतात. उत्तर प्रदेशातून आलेले अनेक मराठी भाषा उत्तम पणे बोलतात, अनेक मराठी सण साजरे करतात. मात्र, काही लोकांमुळे या सामाजिक सलोख्याला गालबोट लागते, असे मुख्यमंत्री म्हणाले.यावेळी मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, एखाद्याला काय खायचे याचे स्वातंत्र्य संविधानाने दिले आहे. पण अशा प्रकारे रोखण्याचा कोणालाही अधिकार नाही. या आधारावर भेदभाव मान्य नाही. अशा तक्रारी आल्यास त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल.

देशातील वैविध्य टिकले पाहिजे, आपली जबाबदारी आहे. क्षेत्रिय अस्मिता म्हणजे मराठी असल्याचा आम्हाला अभिमान आहे, त्यावर घाला घातल्यास सहन करणार नाही, त्याच्यावर कारवाई करणार, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!