मुंबई ( वास्तव पोस्ट ) : राज्यातील विधानसभा २०२४ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची तातडीने बदली करावी, अशी मागणी नाना पत्रद्वारे केंद्रीय निवडणूक आयोगाला केली होती. त्यानंतर आता निवडणूक आयोगाने या तक्रारीची दखल घेत रश्मी शुक्ला यांच्या बदलीचे आदेश काढले आहेत.
गेल्यावेळी महाविकास आघाडी सरकारच्या काळात फोन टॅप केल्याचे आरोप रश्मी शुक्ला यांच्यावर करण्यात आले आहेत. या आधीही विरोधकांकडून रश्मी शुक्ला यांच्या बदलीची मागणी केली गेली होती. आता केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानंतर रश्मी शुक्ला यांची राज्याच्या पोलीस महासंचालक पदावरुन बदली करण्यात आली आहे. रश्मी शुक्ला यांच्यावर विरोधकांचे फोन टॅप प्रकरणामुळे त्या वारंवार वादाच्या भोवऱ्यात सापडल्या होत्या. यापूर्वी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा फोन टॅप केल्याप्रकरणी रश्मी शुक्ला या चर्चेत आल्या होत्या.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांकडून रश्मी शुक्ला अवैध पद्धतीने फोन टॅपिंग करत असल्याचा आरोप करण्यात आला होता. यासह नवाब मलिक यांनी रश्मी शुक्ला या भाजपच्या एजंट असल्यासारखे काम करतात, असा गंभीर आरोपही केला होता.
