CM – EKNATH SHINDE : किनारी मार्गांचे काम युद्धपातळीवर सुरु असुन हे मार्ग टप्प्याटप्प्याने वाहतुकीसाठी खुले करण्यात येत आहेत. या मार्गांमुळे वाहतुकीच्या कोंडीतुन जनतेला दिलासा मिळणार आहे.
मुंबई ( वास्तव पोस्ट न्यूज ) : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्पातील हाजी अली ते खान अब्दुल गफार खान मार्गे राजीव गांधी सागरी सेतूला जोडणाऱ्या उत्तर मार्गिकेची पाहणी केली. या मार्गिकेचे काम पूर्ण झाल्यामुळे उद्यापासून ती रहदारीसाठी खुली करण्यात येणार आहे.
यावेळी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ.अमित सैनी, प्रमुख अभियंता (मुंबई किनारी रस्ता प्रकल्प) गिरीश निकम, उपप्रमुख अभियंता मांतय्या स्वामी आदींसह अभियंते, अधिकारी, सल्लागार व कंत्राटदार उपस्थित होते.
दरम्यान मुंबई सागरी किनारा मार्गाचे काम जसजसे पूर्ण होत आहे तसतसे एक एक टप्पा वाहतुकीसाठी खुला करण्यात येत आहे. यामुळे हाजी अली ते खान अब्दुल गफार खान हा मार्गही वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार असल्याने मुंबईकरांना वाहतूक कोंडीतून मोठा दिलासा मिळणार आहे.
सागरी किनारा मार्गाचे ९१ टक्के काम पूर्ण झाले असून या मार्गाला वांद्रे वरळी सागरी सेतूला जोडण्याचे काम देखील युद्धपातळीवर सुरू आहे. पुढील तीन आठवड्यात हे काम पूर्ण झाल्यावर नरिमन पॉईंट ते वांद्रे हे अंतर अधिक वेगाने कापणे मुंबईकरांना शक्य होणार आहे.
