जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : जळगाव तालुक्यातील बोरनार या गावात एका ४७ वर्षीय शेतमजूराचा सर्पदंश झाल्याने मृत्यू झाल्याची घटना आज घडली. या दुर्दैवी घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहिती नुसार संजय हिरामण पाटील (वय-४७) हे पत्नी आणि दोन मुलांसह बोरनार येथे रहात होते.
संजय पाटील हे शेतमजूरी व शेळीपालनाचा व्यवसाय करून आपली दिनचर्या चालवत होते. आज संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास ते बकऱ्यांना चारा आणायला शेतात गेले असता त्या ठिकाणी चारा काढत असतांना त्यांना सर्पदंश झाला.
ग्रामस्थांनी संजय पाटील यांना खासगी वाहनातून जळगाव येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. याठिकाणी तपासणी केल्यावर वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांना मयत घोषीत केले. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
