यावल ( वास्तव पोस्ट न्यूज ) : यावल शहरातील आश्रय फाउंडेशन, भाजपा वैद्यकीय आघाडी व शेतकऱ्यांच्या वतीने जिल्हा कृषी अधिकारी यांच्याकडे निवेदन देण्यात आले. येत्या खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर बोगस बियाणे कंपनी व विक्रेत्यांवर कारवाई करण्यासाठी भरारी पथक नियुक्त करण्यात यावी अशी मागणी सदर निवेदनाद्वारे करण्यात आली.
यावल येथील आश्रय फाउंडेशनचे अध्यक्ष तथा भाजपा वैद्यकीय आघाडीचे डॉ. कुंदन फेगडे, डॉ. सुनील पाटील, उदयभान पाटील यांनी जळगाव जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयात गुण नियंत्रण अधिकारी विकास बोरसे यांना हे निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे की, जळगाव जिल्ह्यात मान्सूनच्या पावसाने हजेरी लावली असून शेतकऱ्यांनी खरीपच्या पेरण्या करण्यास सुरुवात केली आहे. बऱ्याच ठिकाणी रोप उगवले नसल्याने शेतकरी संताप व्यक्त करीत आहे. याबाबत बोगस कंपन्यांवर व विक्रेत्यांवर कारवाई होत नाही आणि शेतकरी भरडला जातोय. जिल्हा कृषी विभागाकडून बोगस बियाणे कंपनी व विक्रेत्यांवर कारवाई करून भरारी पथक नियुक्त करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली.
