जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : पेरणीचे दिवस जवळ येत असल्याने शेतकरी वर्ग आपल्या शेताच्या मशागतीकडे वळला आहे. अशातच जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी कापूस उत्पादक शेतकऱ्यांना ह्या वर्षी जेव्हा कापूस पिकाची लागवड कराल तेव्हा कापूस सोबत आंतरपिकही घ्यावे असे सांगितले आहे.
आंतरपिक म्हणून तुर, उडीद, मुग, चवळी, या कडधान्याच्या पिकाची एक किंवा दोन ओळीत लागवड करावी. कापूस पिकामध्ये कडधान्याच्या १/२ ओळी आंतरपीक घेतल्याने मजूरीच्या खर्चात बचत होईल, शिवाय यामुळे कापूस उत्पादनात देखील वाढ होऊन आर्थिक उत्पन्न वाढण्यास मदत होते.
त्यामुळे जेव्हा १ किलो कापूस बियाणे घ्याल, तेव्हा १ किलो कडधान्याचे पाकिट नक्की घ्या, असे आवाहन जिल्ह्याधिकारी आयुष प्रसाद यांनी एका चित्रफीतीद्वारे शेतकरी बांधवांना केले आहे. याबाबत तांत्रिक माहितीसाठी आपल्या गावातील कृषि सहाय्यकाशी संपर्क साधण्याचेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.
