पुणे | दि.२० ( वास्तव पोस्ट न्यूज ) – लोकसभा २०२४ ची सार्वत्रिक निवडणूक देशात सात टप्प्यांत होणार असून, राजकीय पक्षांच्या उमेदवारांच्या नावाची घोषणा होत आहेत. दुसरीकडे मात्र आरक्षणाच्या मुद्द्यावर आक्रमक असलेला मराठा समाज प्रत्येक गावातून लोकसभेला उमेदवार देणार असल्याची चर्चा आहे. लोकसभा निवडणुकीत उमेदवारांची संख्या अधिक असल्यास ईव्हीएमवर निवडणूक घेता येईल का ? यावर एका लोकसभा मतदारसंघातून जास्तीजास्त ३८४ पर्यंत उमेदवार निवडणूक रिंगणात उतरल्यास त्या ठिकाणी ईव्हीएम यंत्र वापरता येईल. मात्र, त्यापेक्षा एकही उमेदवार जर अधिक असेल तर बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी लागेल, असे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले आहे.
मराठा समाजाला ओबीसी संवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन उभारले आहे. राज्य शासनाने मराठा समाजाला १० टक्के आरक्षण लागू केले आहे. मात्र, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळाले नाही तर लोकसभा २०२४ निवडणुकीसाठी प्रत्येक गावातून मराठा उमेदवार देण्याची घोषणा करण्यात आली. लोकसभा निवडणूक ही ईव्हीएम मशिनद्वारे घेतली जात आहे. एका यंत्रावर १६ उमेदवारांची नावे असतात. त्यापेक्षा अधिक उमेदवार असल्यास त्यानुसार यंत्रे जोडावी लागतात. आत्तापर्यंत जास्तीत जास्त ४ यंत्रे जोडण्यात आलेली होती. त्यावर ६४ उमेदवार आणि नोटा एक अशा ६५ उमेदवारांसाठी निवडणूक घेता येते.
