शेतकऱ्यांची चिंता वाढली… नागपूरला ऑरेंज अलर्ट !
पुणे | दि.१७ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – उन्हाळ्याचा कडाका जाणवू लागला असतांनाच राज्यातील हवामानात बदल झाल्याने काही भागत पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मार्चच्या मध्यात काही जिल्ह्यांचा पारा ३५ ते ४० पर्यंत पोहचले आहे. दुसरीकडे मात्र हवामान खात्याने विदर्भात काही भागात अवकाळीचा इशारा दिला आहे. त्यामुळे बळीराजा पुन्हा एकदा संकटात सापडतो की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.
दरम्यान, विदर्भात हवामान विभागाने १७ ते १९ मार्चदरम्यान ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा आणि गारपिटीचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्याचबरोबर मराठवाड्यातही १९ मार्च रोजी वादळी वाऱ्यांसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुढील ३ ते ४ दिवस अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे.
दरम्यान, जळगाव, पुणे, मुंबई, सोलापूरसह काही जिल्ह्यांमध्ये उन्हाचा कडाका वाढला आहे. मार्च महिन्यातच उकाड्यात वाढ झाल्याने नागरिक हैराण झाले आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये किमान आणि कमाल तापमानात वाढ होताना दिसत आहे.
