मुंबई | दि.०१ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – एका कार्यक्रमात संजय राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला की, जर उद्धव ठाकरे भाजपसोबत गेले तर संजय राऊत यांची भूमिका काय असणार? या प्रश्नावर संजय राऊत यांनी आपली स्पस्ट भूमिका मांडली. ते म्हणाले की, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत वेगळे नाहीत हे सर्वांना माहीत आहे. उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व हे लोकभावनेचा आदर करणारं आहे. राज्याची लोकभावना शिवसेनेच्या पाठीशी आहे. आघात झाले तरी हा माणूस लढतोय असं लोक म्हणतात. ज्यांनी आमच्यावर ही वेळ आणली त्यांच्यासोबत जाण्याएवढे आम्ही नालायक नाहीत. उद्धव ठाकरे यांना मी जास्त ओळखतो. लोकांचा आमच्यावरचा विश्वास उडेल. राजकारणावरचा विश्वास उडेल. आम्ही म्हणजे नितीश कुमार नाही, असे म्हणत संजय राऊत यांनी निशाणा साधला. पुढे ते असेही म्हणाले, का जावं भाजपसोबत ! असं काय आहे भाजपमध्ये , काय ठेवलंय.
राजकारणात काहीही होऊ शकतं हे खरं आहे. आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सरकार बनवू असं वाटलं होतं का? ही वेळ भाजपने आणली. मग भाजपसोबत का जावं. भाजपा शिवाय शिवसेनेचं उत्तम चाललं आहे. चार माणसांशी लग्न करायला आम्ही काही एलिझाबेथ टेलर नाही. एलिझाबेथ टेलरने केली होती, असे म्हणत राऊतांनी खोचक टोला लगावला . राऊत म्हणाले की भाजपाने महाराष्ट्रात सुडाचं राजकारण केले. शिवसेना अशा माणसाकडे दिली की ज्या एकनाथ शिंदेंकडे महाराष्ट्रातील अर्धा टक्का सुद्धा मतदान नाही. हिम्मत असेल तर ठाण्यात महानगर पालिकेच्या निवडणुका लावाव्यात. अजित पवारांकडे एक टक्का मतदान नाही. महाराष्ट्रातील त्यांचा प्रयोग अयशस्वी झाला आहे. त्यांनी महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाला घातला आहे. कोण किती जागा जिंकणार असं ठरवणारे हे कोण आहेत ? जनताच ठरवेल की किती जागा कोणाला जिंकवून द्यायच्या .
