जळगाव, दि.१६ ( वास्तव पोस्ट जळगाव )– छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि जिल्हा प्रशासनाच्यावतीने शिवाजी महाराजांच्या जीवनकार्यावर आधारीत ‘जाणता राजा’ या महानाट्याचे आयोजन १८,१९ व २० फेब्रुवारी या सलग तीन दिवसात पोलीस कवायत मैदानात होणार आहे. दर दिवशी आठ ते दहा हजार प्रेक्षक बसु शकतील अशी आसन व्यवस्था असणार आहे . त्यासाठी विनाशुल्क पासची व्यवस्था केली असून ती जिल्ह्याच्या विविध शासकीय कार्यालयात उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

“जाणता राजा” महानाट्याचे आयोजन सायंकाळी ७:०० ते १०:०० या वेळेत करण्यात येणार आहे. या महानाटयाकरीता नागरिकांना प्रवेशासाठी निमंत्रण पत्रिका या विनाशुल्क स्वरुपात संबंधित तालुक्याच्या ठिकाणी तहसील कार्यालय, पंचायत समिती, नगर परिषद/नगरपंचायत व जिल्हयाच्या ठिकाणी तहसील कार्यालय, महानगरपालिका व जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतु शाखा येथे उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. नागरिकांनी “जाणता राजा” या महानाटयाचे प्रवेशासाठी निमंत्रण पत्रिका या ठिकाणाहून प्राप्त करुन घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.
