Home » राष्ट्रीय » ममता बॅनर्जी यांचा खळबळजनक दावा : अपघात नसून त्यामागे काही कट असण्याची शक्यता !

ममता बॅनर्जी यांचा खळबळजनक दावा : अपघात नसून त्यामागे काही कट असण्याची शक्यता !

नवी दिल्ली ( वास्तव पोस्ट ) : महाराष्ट्रचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज दि. २८ रोजी सकाळी बारामती येथे झालेल्या विमान दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेने संपूर्ण देशात खळबळ उडाली असून राजकीय वर्तुळातून मोठी शोककळा पसरली आहे. मात्र, ही घटना केवळ अपघात नसून त्यामागे काही कट असण्याची शक्यता वर्तवली असून राजकीय नेत्यांनी या दुर्घटनेची सखोल चौकशीची मागणी केली आहे.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या विमान दुर्घटनेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले असून ही दुर्घटना संशयास्पद वाटत असल्यामुळे याची चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) थेट देखरेखीखाली करण्यात यावी, अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे. त्यांच्या या मागणीस अखिलेश यादव यांनी सहमती दाखवली आहे. ममता बॅनर्जी यांच्यासोबतच जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनीही ही दुर्घटना म्हणजे केवळ एक अपघात असू शकत नाही, असे म्हणत उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे.

अजित पवार यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, “अजित पवार यांच्या निधनाची बातमी समजताच मला मोठा धक्का बसला. आजच्या काळात देशातील महत्त्वाच्या नेत्यांच्या आणि सर्वसामान्यांच्या सुरक्षेचा कोणताही भरवसा उरलेला नाही. अजित पवार यांच्या मृत्यूची निष्पक्ष चौकशी होणे गरजेचे आहे आणि ती केवळ सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखालीच व्हायला हवी.”

ममता बॅनर्जी यांनी आपल्या वक्तव्यात एक खळबळजनक दावा केला आहे. त्यांनी म्हटले की, अजित पवार हे सत्ताधारी महायुतीपासून दूर जाण्याच्या विचारात होते. ते दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा एकत्र करण्याच्या प्रयत्नात होते. अशा स्थितीत ही दुर्घटना घडणे संशयास्पद वाटते,” असे बॅनर्जी यांनी नमूद केले.

या प्रकरणाचा तपास इतर कोणत्याही यंत्रणेमार्फत करण्यास ममता बॅनर्जी यांनी विरोध दर्शवला आहे. “आम्हाला देशातील इतर कोणत्याही तपास यंत्रणेवर विश्वास नाही, कारण सर्व यंत्रणांवर दबाव आणला जात आहे किंवा त्या विकत घेतल्या गेल्या आहेत. केवळ सर्वोच्च न्यायालयच या प्रकरणाचा सत्य शोधून काढू शकते,” असे परखड मत त्यांनी व्यक्त केले.

अजित पवार यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. या दुर्घटनेच्या चौकशीबाबत आता केंद्र आणि राज्य सरकार काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!