Headlines
Home » जळगाव » शकुंतला जैन यांचे संथारा व्रता सह निधन

शकुंतला जैन यांचे संथारा व्रता सह निधन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जळगाव येथील रहिवासी  शकुंतलाबाई कांतीलाल जैन यांचे आज दि. २ नोव्हेंबर रोजी सकाळी ६:४० वाजता वयाच्या ७८व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, जावई, मुली आणि नातवंडे असा परिवार आहे. त्या जैन इरिगेशनचे महाराष्ट्र विपणन प्रमुख अभय जैन आणि जळगाव पॉलिमर्स चे संचालक अविनाश जैन यांच्या आई होत. तसेच जैन श्री संघाचे संघपती दलीचंद जैन यांच्या स्नुषा तर जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलालजी जैन यांच्या लहान भावजयी, जैन इरिगेशन  सिस्टिम्स लि.चे अशोक, अनिल, अजित, अतुल जैन यांच्या काकू होत. सकाळी १०:१५ वाजता त्यांची अंतिम यात्रा श्रद्धा कॉलनी येथील निवास स्थानापासून निघाली त्यानंतर मोक्षधाम, जैन हिल्स येथे अंतिम संस्कार करण्यात आले.

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी असल्याने उपचारासाठी इस्पितळात दाखल करण्यात आले असता त्यांनी संथारा समाधीमरण व्रत स्वीकारले होते. त्यांच्या इच्छेनुसार त्यांचे नेत्रदान करण्यात. त्यांच्या संथारा व्रतासह निधनाने जैन परिवारासह, आप्तेष्ट, नातेवाईक व विस्तारित परिवारात  शोककळा पसरली आहे. शकुंतलाबाई या जळगाव येथील रायसोनी परिवाराच्या कन्या होत्या.

प्लास्टिक व्यवसायात योगदानाबद्दल गौरव 

भारतीय प्लास्टिक व्यवसायात आपल्या योगदान आणि यशस्वीतेसाठी केलेल्या कार्याला अधोरेखित करत शकुंतला कांतिलालजी जैन यांचा ‘लाईफ टाईम अचिव्हमेंट’ पुरस्काराने गौरव करण्यात आला होता. हा विशेष पुरस्कार मुंबई येथील ताज लॅण्डस् एंड वांद्रे येथे आयोजित कार्यक्रमात जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ, पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला होता.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!