मुंबई ( वास्तव पोस्ट ) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या प्रमुख उपस्थितीत राजभवन, मुंबई येथे ‘प्राकृतिक कृषी संमेलन २०२५’ पार पडले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले की, नैसर्गिक शेती ही केवळ शेतीची पद्धत नसून ती शाश्वत शेतीकडे नेणारी एक सर्वसमावेशक दृष्टी आहे. रासायनिक खतांसह बियाणांचा अतिवापर जमिनीची सुपीकता कमी करत आहे, त्यामुळे उत्पादन खर्च वाढत असून शेतकऱ्यांवर संकट येत आहे. अशा स्थितीत नैसर्गिक शेती ही निसर्गाशी सुसंगत आणि नफा वाढवणारी दिशा ठरते. निसर्गाने दिलेल्या प्रत्येक घटकाचा उपयोग करून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करता येतो आणि पर्यावरणाचा समतोल राखत शाश्वत विकास साधता येतो.
२०१४ मध्ये महाराष्ट्र शासनाने नैसर्गिक शेती मिशन सुरू केले होते, ज्या अंतर्गत १४ लाख हेक्टर क्षेत्र नैसर्गिक शेतीखाली आणण्यात आले. २०२३ साली राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या व्याख्यानानंतर नव्या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून २५ लाख हेक्टर क्षेत्र नैसर्गिक शेतीखाली आणण्याचा निर्णय घेण्यात आला. वातावरणातील बदलांचा शेतीवर होणारा परिणाम लक्षात घेता, पुढील काळात शेती नैसर्गिक शेतीच्या दिशेने नेणे अत्यावश्यक असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी अधोरेखित केले.

मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानातील मार्गदर्शक तत्त्वांमध्ये गोसंवर्धनाचे महत्त्व अधोरेखित केले आहे. गोमातेचे शेतीतील स्थान अत्यंत महत्त्वाचे असून, गोधन टिकवणे म्हणजेच शेतीचा जीव टिकवणे आहे. त्यामुळे गोधन आणि नैसर्गिक शेती यांचा परस्परसंबंध पुन्हा प्रस्थापित करणे आवश्यक आहे.
राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी नैसर्गिक शेतीविषयी केलेले प्रयोग प्रेरणादायी असल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात नैसर्गिक शेतीचे मोठे मिशन राबवले जाईल. नैसर्गिक शेतीच्या गटांच्या माध्यमातून प्रत्यक्ष कार्यान्वयन करीत, शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवू आणि महाराष्ट्राला नैसर्गिक शेतीचे पुढचे हब बनवू, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
