मुंबई ( वास्तव पोस्ट ) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे ‘मुख्यमंत्री कार्यालय सामाजिक क्षेत्र वॉर रूम’ अंतर्गत योजनांच्या प्रभावी अंमलबजावणी संदर्भात आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी अमृत 2.0 अभियान, १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून पायाभूत आरोग्य सुविधा, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, प्रधानमंत्री आयुष्मान भारत आरोग्य पायाभूत सोयी सुविधा मिशन या योजनांचा मुख्यमंत्री फडणवीस यांनी विस्तृत आढावा घेतला.

या बैठकीला जिल्हाधिकारी जळगाव आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी जळगाव जिल्ह्यातील विविध योजनांच्या प्रगतीचे सादरीकरण केले. यावेळी मंत्री आदिती तटकरे, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर मुख्य सचिव राजेश कुमार उपस्थित होते.
जनसामान्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासन विविध योजना, उपक्रम व अभियानांची अंमलबजावणी करीत असते. या सर्वांचे प्रभावी कार्यान्वयन करण्याची जबाबदारी यंत्रणांची आहे. या योजनांच्या परिणामकारक अंमलबजावणीतून जनसामान्यांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवून आणावे, केंद्रीय योजनांच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र कुठेही मागे पडणार नाही, याबाबत यंत्रणांनी सतर्क रहावे, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी संबंधितांना दिले.
